इस्लामाबाद – अमेरिकेच्या दबावानंतरही भारताने रशियाकडून क्रूड तेलाची आयात केल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताच्या स्वतंत्र परदेश धोरणाचे कौतुक केले आहे.
नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर टीका करणाऱ्या इम्रान खान यांनी खैबर पख्तुन्वा प्रांतातील एका समारंभात भारताच्या परराष्ट्र धोरणाचे अगदी तोंडभरून कौतुक केले आहे. भारताचे परराष्ट्र धोरण “स्वतंत्र’ आहे. याबद्दल आपल्याला भारताचे कौतुक करावेसे वाटते आहे, असे ते म्हणाले.
युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे अमेरिकेने रशियावर निर्यातीबाबत निर्बंध घातले आहेत. भारत हा “क्वॉड’ गटाचा सदस्य आहे. या गटामध्ये भारत आणि अमेरिकेव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया आमि जपान हे अन्य सदस्य आहेत. मात्र तरिही भारताने रशियाकडून क्रूड तेलाची आयात केली. याचे इम्रान खान यांनी कौतुक केले.
आपले परराष्ट्र धोरण देखील पाकिस्तानच्या जनतेच्या लाभाचाच विचार करते. आपण देखील कोणत्याही देशासमोर झुकणार नाही, असेही त्यांनी सांगितले.