मुंबई – राज्यातील बहुतांश भागात पुढील तीन दिवस अवकाळीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तसेच येत्या दोन दिवसात अंदमान, निकोबार बेटावर आणि बंगाल उपसागराच्या दक्षिण भागात मान्सूनची आगेकूच होताना दिसत आहे.
राज्याच्या सर्वच भागांत कमाल तापमानाचा पारा 40 ते 45 अंशांच्या आसपास पोहचला.
त्यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून कडक उन्हामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. पण त्यांना आता दिलासा मिळणार आहे. कारण पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस बरसणार आहे. त्यामुळे तापमानाचा पारा चाळीस अंशांपर्यंत घसरू शकतो, असे हवामान विभागाने सांगितले.
मान्सून दोन दिवसांत अंदमान, निकोबार, बंगालचा उपसागर व्यापणार बंगालच्या उपसागरात सध्या जोरदार वारे वाहू लागले आहेत. राजस्थान ते मध्य प्रदेशपर्यंत चक्रीय स्थिती तयार झाली आहे. तसेच दक्षिण भारताकडून बाष्पयुक्त वारे राज्याकडे वाहत असल्यामुळे राज्यात अवकाळी पाऊस पुढील काही दिवस पडू शकतो.
ईशान्य राजस्थानपासून ते मध्यप्रदेशपर्यंत चक्रीय स्थिती आहे आणि बंगालच्या उपसागरापासून ते ईशान्य भारतातील बहुतांश राज्यांपर्यंत जोरदार वारे वाहत असल्यामुळे मान्सूनचा प्रवास सुकर झाला असून पुढे सरकण्यासही अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.