मुंबई : राज्याच्या विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या ठरावावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलाच राडा पाहायला मिळाला. सभागृह स्थगित झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घातलेल्या गोंधळावरून विरोधी पक्षाचे १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. १ वर्षासाठी हे निलंबन असणार आहे. त्यावरुन, आमदार नितेश राणेंनी केलेल्या टीकेला भास्कर जाधव यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
विधानसभेतील 12 आमदारांवरील निलंबनाच्या कारवाईवरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी सरकारवर प्रहार केला. नितेश राणे म्हणाले की, आमचे १२ आमदार सैनिकासारखे लढले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून त्यांचे निलंबन करण्यात आले. आम्ही कोकणातले आहोत, भास्कर जाधव कोकणातले आहेत, कोकणात दशावतार असतो. त्यात सोंगाड्या, नरकासूर भूमिका आहे. भास्कर जाधव सोंगाड्या, नरकासूर आहे अशी घणाघाती टीका नितेश राणेंनी केली होती.
नितेश राणेंच्या या टिकेला प्रत्युत्तर देण्याची गरज नसल्याचे जाधव यांनी म्हटले. मी फडतूस माणसांबद्दल बोलत नसतो, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी नितेश राणेंना फडतूस म्हणत त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.
तालिका अध्यक्षाच्या खुर्चीचा अपमान या सोंगाड्याने केला आहे. या नरकासूरावर विश्वास ठेवायची गरज नाही. मला आश्चर्य वाटतं ते रडले नाहीत, स्वत:चे कपडे फाडले नाहीत. या सरकारकडून काही अपेक्षा नाही, ओबीसी आरक्षणावरून आमचे सहकारी लढले आहेत. कोकणातली माणसं भास्कर जाधव यांना चांगलेच ओळखतात. हा माणूस सोंगाड्या, नरकासूर आहे असे नितेश राणे म्हणाले.