कात्रज, दि. 10 (प्रतिनिधी) -कात्रज येथील कायम रहदारीचा असलेल्या शहराला जोडणाऱ्या संत खेतेश्वर चौक येथे कात्रज-कोंढव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मधोमध अनेक दिवसांपासून उच्च दाब विद्युत वाहक खांब वाकलेल्या स्थितीमध्ये असून तो कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका आहे. मात्र, याकडे महावितरण विभागाचे दुर्लक्ष आहे. हा खांब चौकात कोसळल्यास विद्युत वाहकतारांमुळे मोठी दुर्घटना घडण्याचा धोका आहे. त्यामुळे हा धोकादायक खांब काढावा, अशी मागणी स्थानिक नागरिक तसेच वाहन चालकांकडून करण्यात आली आहे.
मात्र, या चौकामध्ये कात्रज- देहूरोड बाह्यवळण रस्त्यावरून वंडर सिटी पासून कोंढवा रस्त्यावर उड्डाणपूल होत असल्याने या वाकलेल्या खांबाकडे दुर्लक्ष होत आहे. काम सुरू असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत हा खांब काढण्यात येईल, असे वाटत असल्याने महावितरणकडून याकडे दुर्लक्ष होत आहे, अशी नागरिक तक्रार करीत आहेत. मात्र, तोपर्यंत एखादे वाहन याला धडकून खांब कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कात्रज येथील घाटातून शहरांमध्ये तसेच मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, त्यामुळे अनेकदा या चौकामध्ये वाहतूक कोंडी होत असते अशात हा खांब कोसळला तर मोठी जीवितहानीही होऊ शकते.
कोंढव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील या विद्युत खांबाला काही वाहने धडकल्याने हा खांब वाकला आहे. शिवाय मुख्य खांबदेखील तिरका झाला आहे. मात्र, याकडे अजूनही महावितरण विभागाचे दुर्लक्ष असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. हा खांब दुरुस्त करावा किंवा येथून भूमिगत विद्युत वाहिनी टाकावी, अशी मागणी होत आहे.
कात्रज येथील चौकातील धोकादायक असलेला विजेचा खांब काढण्यासंदर्भात पाठपुरावा करून तो तत्काळ काढण्याच्या सूचना केल्या जातील. याबाबत संबंधित यंत्रणेस तातडीने सांगितले जाईल.
– प्रताप बोबडे, टीम लीडर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
कात्रज येथे उड्डाणपूल होत असून त्या संदर्भात रस्त्यावरील कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत तेथील कामे करण्यात येत आहे, त्यानुसार सदर धोकादायक खांब काढण्यात येईल.
– संजय घोडके,
अतिरिक्त कार्यकारी अभियंता, एमएसईबी