मुंबई – राज्यात रोज नवीनवीन राजकीय घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या फुटीनंतर अजित पवार गटाचे मंत्री काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. यावेळी अजित पवार गटाचे मंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. त्यांनी शरद पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. मार्ग काढण्याची देखील विनंती केली. मात्र, त्यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
त्यानंतर आज महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा अजित पवार गटाचे सर्वच आमदार शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यावेळी देखील तास भर चर्चा झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे. ‘पक्ष एकसंघ रहावा यासाठी शरद पवार यांनी विचार करावा’, अशी विनंती आम्ही केली असल्याचे प्रफुल पटेल यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, या सगळ्या घडामोडींवर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. यावेळी राऊत माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, “राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात बंड करून फुटलेले लोक हे अपात्र ठरणारच आहेत. त्यामुळेच अजित पवार गटाचे नेते शरद पवार यांच्या दारात उभे होते.
मात्र आम्ही शरद पवारांच्या जागी असतो तर अजितदादांना गेट लॉस्ट केलं असतं. पण पवार साहेबांचा स्वभाव थोडा वेगळा आहे, त्यांच्या पक्षाचं चरित्र थोडं वेगळं आहे. स्वभावामध्ये काही गुण असतात-काही दोष असतात, त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे काम केलं”. असं संजय राऊत यावेळी म्हणाले आहे.