पुणे : संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड आणि मनसे यांच्यात शाब्दिक चकमकीचे आता संघर्षात रूपांतर होण्याची चिन्हं दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ९९ व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला पुण्यात हजेरी लावली होती. तेव्हा राज ठाकरेंनी जाती व्यवस्थेवरुन अप्रत्यक्षपणे काही नेत्यांवर निशाणा साधला होता. त्यानंतर प्रविण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडले होते.
प्रविण गायकवाड यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर पुण्यातील मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे दिसत आहे. मनसेचे पुणे शहर अध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांनी, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून इच्छुक असणारा तू मी स्वत: गल्लोगल्ली फिरताना तुला पाहिलंय. मी प्रविण गायकवाड, असे सांगत होतास. तुला राज ठाकरे काय कळणार? लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू… असा इशारा त्यांनी दिला आहे.
तर राज ठाकरे नेहमी जातीपातीच्या पलीकडच्या राजकारणातील घटना सांगतात, रोखठोक बोलतात. योग्य ते योग्य, चूक ते चूक स्पष्ट भूमिका मांडतात. २१ व्या शतकात महाराष्ट्राचे व्हिजन, भविष्य संदर्भात बोलतात. एकच जात माणुसकी, महाराष्ट्र धर्म, तरीही काही असंतुष्ट लोकांना, बिनकामी लोकांना बोलायचे असेल तर त्यांनी चौकटीत बोलायचं.
आपण जर आपली पात्रता सोडून बोलला तर महाराष्ट्र सैनिक, राजदूत पात्रता सोडून जशास तसं छान उत्तरं देतील. राज ठाकरे नुसते बोलत नाहीत तर सत्य, वस्तूस्थिती आणि रोखठोक बोलतात. काम प्रचंड करतात. उगाच लोक कृष्णकुंजवर येऊन त्यांच्या अडचणी मांडत नाही. कारण प्रश्न अनेक असतील तर उत्तर राज ठाकरे आहेत अशा शब्दात मनसेच्या महिला शहराध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे यांनी सुनावले आहे.