मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याने सध्या नव्याने हातमिळवणी केलेल्या शिवसेना आणि वंचित यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, कारण खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना शरद पवारांविषयी बोलताना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या याच सल्ल्यावर प्रकाश आंबेडकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
याविषयी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी,”सांभाळून बोला हा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला असता तर मानला असता”, असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी,’आमची युती शिवसेनेशी झाली असल्याचा पुनरुच्चार आज प्रकाश आंबेडकरांनी केला.
दरम्यान, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कोणताही राजकीय पक्ष एकमेकांचे शत्रू नाहीत. पण वंचित बहुजन आघाडी एमआयएम बरोबर युती करणार नसल्याचे आंबेडकरांनी सांगितले. भाजपने मनस्मृती सोडली, तर त्यांच्यासोबत चर्चा होऊ शकते, असंही ते म्हणाले. हुकूमशाही थांबवणे आणि लोकशाही वाचवणे ही सध्याची गरज आहे. त्यामुळं जे जे लोकशाहीवादी आहेत, अशा सर्वांनी एकत्र आलं पाहिजे हीच आमची भूमिका असल्याचा उल्लेख प्रकाश आंबेडकरांनी केला.
प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नसल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष आहेत. त्यांच्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी अशी वक्तव्य करणं आम्हाला मान्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपचे आहेत, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केले होते.
प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका घेताना जपून शब्द वापरायला हवेत, असे संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीसोबत एकत्र काम करायचे आहे. त्यामुळं भूतकाळातील मतभेद आपल्याला दूर ठेवायला हवेत आणि भक्कम आघाडी उभा राहायला हवी असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
‘शरद पवार हे आजही भाजपसोबत आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची राजकीय युती झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी हे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्त्व्यानंतर राजकीय नेत्यांकडून विविध प्रतिक्रया येत आहेत.