आयपीएल स्पर्धेत यंदाच्या मोसमात सातत्याने पंचांच्या निर्णायविरुद्ध खेळाडू अकांडतांडव करताना दिसत आहेत. दिल्ली कॅपिटल्स व राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात जे काही घडले ते सहज टाळता आले असते. तरीही आता त्याचे कवित्व अद्याप संपणार नाही. पण एक मत व्यक्त करावेसे वाटते की जर खेळाडू, प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफमधील काहींनी गैरवर्तन केले तर त्यांच्यावर कारवाई केली जाते; मग मैदानावरील पंचांनी तसेच तिसरे पंच व सामनाधिकारी व्यक्तीनी चूक केली तर त्यांच्यावरही कारवाई झालीच पाहिजे.
रॉमन पॉवेलला ओबेड मकॉयने टाकलेला चेंडू वेस्ट हाइटच्या वर होता, तो नोबॉल आहे हे लक्षात येत होते तरीही पंचांनी तो नोबॉल दिला नाही व खूप मोठा ड्रामा सुरू झाला. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत, प्रशिक्षक प्रवीण आमरे भडकले व त्यांनी पंचांशी वाद घालण्यास सुरुवात केली. आमरे यांनी तर थेट मैदानावर जाऊन पंचांशी हुज्जत घातली. त्यांना पंचांनी मैदानातून बाहेर जाण्यास सांगितले. त्याचवेळी डगआऊटमध्ये पंतने बाहेर असलेल्या चौथ्या पंचांशी वाद घातला.
हे सर्व घडताना पंतने खेळपट्टीवरील दोन्ही फलंदाजांना म्हणजे पॉवेल व कुलदीप यादव यांना मैदान सोडून बाहेर येण्यास सांगितले व मोठे नाट्य घडवले. त्याचवेळी परिस्थितीचे गांभीर्य शेन वॉटसनने ओळखले व पंतशी संवाद साधत फलंदाजांना माघारी बोलावण्यापासून परावृत्त केले व सामना सुरू झाला. हे घडले त्याबरोबरच सामनाधिकारींनी पंचांशा चर्चा करून सामना संपल्यावर पंत, आमरे व मकॉय यांच्यावर कारवाई केली. हा या शिक्षा करण्याचा एक भाग झाला. मात्र, ज्यांनी चूक केली ते नामानिराळे राहिले. जर खेळाडूंनी गैरवर्तन केले तर त्यांच्यावर कारवाई होते, मग पंचांनी चूक केली तर त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही.
अम्पायर इज सोल जज असे म्हटले जायचे ते फार पूर्वी आता ती परिस्थिती नाही. आता पंचांच्या कामगिरीवर तथ्य तपासण्यासाठी डीआरएस आहे, रिप्ले आहे मग जर मैदानावरील पंचांना योग्य निर्णय ठरवताना संभ्रम निर्माण होत असेल तर त्यांनी तिसऱ्या पंचांची मदत घ्यायला हवी होती. ती का घेतली गेली नाही.
तंत्रज्ञान सज्ज असताना पंचांना ही मदत घ्यायला कमीपणा वाटतो का. जर सुविधा आहे तर ती का टाळायची. मागे एकदा वरिष्ठ पंच स्टीव्ह बकनर यांनी स्पष्ट कबुली दिली होती, की त्यांनी सचिन तेंडुलकरला अनेकदा चुकीच्या पद्धतीने बाद दिले होते. त्यांच्या कबुलीनाम्यावरही आयसीसी गप्प बसली होती. जर खेळाडूंच्या गैरवर्तनावर जागे होणारी आयसीसी असो किंवा बीसीसीआय किंव जगभरातील कोणतेही क्रिकेट मंडळ त्यांनी पंचांच्या चुकांवरही पांघरूण घालता कामा नये. चूक काय केली किंवा झाली ते पाहिले जावे कोणी केली ते नव्हे. हे राजकारण नव्हे, क्रिकेट आहे. त्यामुळे पक्षपात होऊ नये इतकीच अपेक्षा.