मुंबई – माजी मुख्यमंत्री व राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra fadanvis on OBC reservation ) यांनी आज ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास रस्त्यावर उतरून विरोध करू असा इशारा ठाकरे सरकारला दिला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला असून सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठा समाजावर ही नामुष्की ओढावल्याचा आरोप भाजप नेते करत आहेत. अशातच आज फडणवीस यांनी, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे मात्र ओबीसींच्या आरक्षणात कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही’ स्पष्ट भूमिका मांडली.
यावेळी बोलताना त्यांनी, राष्टवादी काँग्रेस व काँग्रेसने ओबीसी आरक्षणाबाबतची आपली अधिकृत भूमिका जाहीर करावी अशी मागणी देखील केली. ते भाजप ओबीसी कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये बोलत होते. ( Devendra fadanvis on OBC reservation )
काय म्हणाले फडणवीस?
यावेळी बोलताना फडणवीस यांनी राज्य सरकारला, “मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही त्यात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही याबद्दलचं कलम टाकलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. पण या कलमाला कोणतीही स्थगिती दिली नाही. या कलमाद्वारे आम्ही ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिलं. मात्र ओबीसी आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला तर याद राखा, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही” असा इशारा दिला.
दरम्यान, “ओबीसी आरक्षणाला हात लावाल तर खबरदार! भाजपा रस्त्यावर उतरून आंदोलन काढल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसंच ते म्हणाले की मला दुसरं आश्चर्य हे वाटतं की सरकारमधले मंत्रीच मोर्चे काढत आहेत. सरकारमधल्या मंत्र्यांना सरकारविरोधात मोर्चे काढण्याचा अधिकार नाही. बाहेर मोर्चे काढून लोकांना भरकटवलं जातं आहे. त्यापेक्षा मंत्रिमंडळात ठराव आणा की ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही असा ठराव तरी मान्य करा.” असं आव्हानही त्यांनी राज्य सरकारला दिलं.