भारत : देशात सध्या पावसाळ्याच्या दिवसात उन्हाळ्यासारखे उन्हाचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहेत. पावसाने देशातील काही भागात ओढ दिल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. त्यातच राजधानी दिल्लीसह देशातील काही भागांमध्ये उष्णेतची लाट कायम राहणार आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाकडून ओडिशा, तेलंगणा, केरळच्या विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दिल्लीकरांना सध्या तरी उष्णतेपासून दिलासा मिळणार नाही. तसेच, येत्या काही दिवसांमध्ये दिल्लीमध्ये उष्णतेचे प्रमाण वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
तर तिकडे उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागामध्ये 4 सप्टेंबरपर्यंत वातावरण कोरंड राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागामध्ये 5 सप्टेंबरनंतर मान्सून वेगाने सक्रिय होण्याची शक्यता आहे. तसेच, 5 आणि 6 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील पश्चिम भागांमध्ये काही शहरांत हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पूर्व भागांमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्यासोबतच उत्तराखंडच्या मैदानी भागामध्ये काही ठिकाणी वातावरण स्वच्छ राहिल. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने 6 सप्टेंबरपर्यंत चार जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केलाय. तर दुसरीकडे हवामान विभागाने ओडिशा, छत्तीसगडमधील पुढचे पाच दिवस मान्सून सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. पाच सप्टेंबरपासून ईशान्य भारत, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता असल्याचेही सांगण्यात येत आहे.
राज्यात पुढील पाच ते सात दिवस मान्सून सक्रिय राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर येत्या 48 तासांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची अंदाज हवमान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिली आहे.