पणजी – सरदार वल्लभभाई पटेल आणखी काही काळ जिवंत असते, तर कदाचित गोवा गोवा 1961 आधीच मुक्त होऊ शकला असता, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडिअममध्ये गोव्यातील जनतेला संबोधित करताना त्यांनी हे विधान केले.
गोवा मुक्तिदिनाच्या हीरक महोत्सव पणजीसह संपूर्ण राज्यात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुक्तिदिनानिमित्त गोव्यात हजेरी लावत गोव्यातील जनतेला संबोधित केले.
गोव्याची राजभाषा असलेल्या कोकणीतून आपल्या संबोधनाची सुरुवात करण्याआधी मोदींनी वेगवेगळ्या प्रकल्पांचे अनावरण केले.
मोदींनी गोव्यासाठी 60व्या मुक्तिदिनानिमित्त तब्बल 600 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ केल्याचा दावा केला. यात आग्वाद किल्यातील संग्रहालय, गोवा मेडिकल कॉलेजमधील सुपर स्पेशालिटी ब्लॉक, दक्षिण गोव्यातील नव्या जिल्हा रुग्णालयासह मोपा विमानतळातील कौशल्य विकास केंद्र आणि दवर्ली, नावेलीसह मडगावातील गॅस इन्सुलेटेड उपकेंद्राचेही उद्घाटन केले.