पळसदेव – महाराष्ट्रात मोठ्या संख्येने वृद्ध आश्रम वाढत आहेत. ही सगळी सुनांची पुण्याई मोठी आहे. घरात आलेल्या सुनेनं सासू-सासऱ्याला आई वडिलांसारखं मानलं व त्या प्रमाणे त्यांचा सांभाळ केला तर महाराष्ट्रातील वृद्ध आश्रम बंद होतील, असे मत हभप संतोष महाराज गाडेकर यांनी व्यक्त केले.
पळसदेव येथे डॉक्टर हिंगमिरे यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आयोजित कीर्तनाच्या वेळी महाराज बोलत होते. या वेळी गाडेकर महाराजांनी सांगितले की, महाराष्ट्रात उच्च शिक्षित मुलं आई वडिलांना सांभाळत नाही. शिक्षण मोठं झाले, मुलं उच्च शिक्षित झाली; मात्र संस्काराच्या बाबतील शून्य झाली असल्याची खंत या वेळी त्यांनी बोलून दाखवली.
बरेच उच्च शिक्षित मुलं आपल्या आई वडिलांना सांभाळत नाहीत. त्यामुळे त्यांना वृद्ध आश्रमात जावे लागते. सध्या महाराष्ट्रातील वृद्धाश्रमात पाहणी केली असता अनेक मोठ्या घरातील मुलांचे पालक येथै आहेत. ही प्रगत महाराष्टाची मोठी शोकांतिका आहे. कुटुंब लहान झाली आणि या लहान कुटुंबात आजी-आजोबा नकोशे झाले आहेत.
तत्वावर संस्कार करण्यासाठी आजी आजोबांची आवश्यकता आहे. त्यामुळे पोरांनो आपल्या आई वडिलांना सांभाळावे, असा सल्लाही या वेळी महाराजांनी दिला. महाराष्ट्र झपाट्याने प्रगती करत आहे. मात्र हि प्रगती होताना आपली संस्कृती आपण विसरत चाललो आहे. छोटी कुटुंबपद्धती यासाठी कारणीभूत ठरत आहे. या वेळी गंगाधर हिंगमिरे, डॉक्टर औदुंबर हिंगमिरे, धैर्यशील हिंगमिरे, नामदेव हिंगमिरे, समीर हिंगमिरे सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.