समाजामध्ये राजकीय वारसा, आरक्षण, राजकारणातील वारसदार असे अनेक उपसरपंच आपण पाहिलेले आहे. मात्र, खेड तालुक्यातील महानगाव निघोजे गावचे धडाकेबाज नेतृत्व, नागरिकांच्या मनातील आदर्श माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य, सरपंच परिषदेचे अध्यक्ष आशिष विलास येळवंडे यांची जिद्द, चिकाटी, समाज व गावाविषयी असलेली आत्मीयता यामधून केलेले कार्य आदर्शवत् आहे. या कार्याचा अनेक तरुण सरपंच, उपसरपंच यांनी आदर्श घ्यावा, अशी युवा माजी उपसरपंचाची यशोगाथा आहे.
नगर जिल्ह्यातील गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या पोपटराव पवार, समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुणे जिल्ह्यातील निघोजे गावचे आशिष येळवंडे माजी आदर्श उपसरपंच घडले असून ते इतरांसाठी प्रेरणास्रोत बनले आहेत. आशिष येळवंडे
38 वर्षांचे असून घरची परिस्थिती हलाखीची असताना 12 वीत विज्ञान शाखेत उत्तीर्ण झाल्यानंतर आकुर्डी येथील बी. एस्सी. प्रथमवर्षाचे शिक्षण घेत असताना घरीची परिस्थिती बेताची झाली होती. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून 2003 मध्ये आय. टी. पार्कमध्ये कार्यालय असिस्टंट म्हणून नोकरी केली. दरम्यान, 2007 मध्ये येळवंडे यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. 2007 मध्ये महाराष्ट्र शासनाने म. रा. औद्योगिक विकास महामंडळासाठी निघोजे महानगाव, महाळुंगे इंगळे आदी अनेक गावांची जमीन औद्योगिक कंपन्यांसाठी घेतली. त्यात आशिष यांचीही जमीन सरकारने घेतली. त्या जमिनीची रीतसर रक्कम मिळाल्यानंतर आशिष यांनी आय. टी. पार्कमधील नोकरी सोडली व त्याच रकमेतून त्यांनी कंपन्यांसाठी लेबर कॉन्ट्रक्टर व शिव गोरक्षस्वामी लॉजिस्टिक कंपनी 2009 मध्ये सुरू केली.
आशिष हे हुशार व लोकोपयोगी कामे करण्याची त्यांची आवड ही त्यांच्यात लहानपणापासूनच रूजली आहे. त्यांनी समाजकार्याचा ध्यास घेऊन गावच्या सामाजिक कार्यात सार्वजनिक सण उत्सवात, शिवजयंती, नागरिकांच्या सुख-दुःखात सहभाग घेऊन अडीअडचणी व संकटात असणाऱ्या लोकांना मदतीचा वसा घेतला. याच त्यांच्या समाजकार्याची पावती म्हणून 2012 ला लोकांनी त्यांना निघोजे ग्रामपंचायतीवर बिनविरोध निवडून देण्याचे ठरविले; परंतु त्यांच्या उदार दृष्टिकोनामुळे त्यांनी स्वतः ग्रामपंचायत सदस्यासाठी निवडणुकीचा फॉर्म न भरता दुसऱ्या आपल्या एका मित्रास संधी दिली. त्यानंतर 2017 च्या निघोजे महानगाव ग्रामपंचायत निवडणूक ते बहुमताच्या दुप्पट मतांनी निवडून आले. यावेळी सरपंचपदासाठी आरक्षण असून सरपंच हे लोकनियुक्त पद होते. आशिष यांना सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व पक्ष, संस्था, सोसायटी यांच्या सहकार्याने बिनविरोध उपसरपंच म्हणून कार्य करण्याची संधी दिली. या संधीचे त्यांनी सोने केले अन् गावात विकासाची गंगा वाहिली.
दरम्यान, आशिष येळवंडे यांनी आपला शिव गोरक्षस्वामी लॉजिस्टिकचा ट्रान्स्पोर्ट व्यवसाय मोठ्या स्वरूपात सुरू केला. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी परिसरातील, गावातील तरुणांच्या गाड्या कंपन्यांसाठी भाडेतत्त्वावर लावून त्यांना आर्थिक स्वयंपूर्णतः निर्माण करून दिली. व्यक्तिगत स्वरूपात करोना काळात 140 भाडेकरूचे भाडे माफ करून त्यांना अन्नधान्य किटचे वाटप केले. ठाकूर पिंपरीच्या अनाथ आश्रमासाठी जीवनावश्यक वस्तू, सॅनिटायझर आदी प्रकारची भरघोस मदत केली. करोना काळात रक्तदान शिबिर घेतले व प्रत्येक रक्तदात्यास वाफेचे मशीन भेट दिले. करोना काळातील त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना “करोना शिलेदार’ व “करोना संघर्षयोद्धा’ हे दोन पुरस्कार मिळाले.
झेडपी लढविणार
भविष्यात पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या आशीर्वादाने लढविणार आहे. दरम्यान, समाजकार्यासाठी गावांतील सर्व ग्रामस्थ, संस्था, ग्रामपंचायत सोसायटी सदस्य यांचे कायमच सहकार्य असून या नागरिकांच्या मनातील आदर्श जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांच्या हातून असेच गावच्या विकासाचे कार्य घडो हीच नागरिकांची सदिच्छा आहे.
उल्लेखनीय कार्य –
घनकचरा संकलन
आजी-आजोबा केंद्र सुशोभिकरण
पर्यावरण पूरक शाळा फडके वस्ती
वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
महिला सक्षमीकरण
लहान मुलींना पोस्टात मोफत खाते उघडून दिली
गावातील तरुणांना कराटेसाठी किट उपलब्ध करून देण्यात आले
विविध भागांमध्ये जिल्हा परिषद व माध्यमिक विद्यालयात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
पावसाळ्यात विद्यार्थांना छत्री, ड्रेस, वह्या वाटप
आगामी व्हिजन –
प्रत्येकाला 24 तास पाणीपुरवठा
स्वच्छ ड्रेनेज सिस्टिम
मैला शुद्धीकरणासाठी एसटीपी प्लॅन्ट उभा करून त्या द्वारे पाण्याचे शुद्धीकरण करूनच नदीला पाणी सोडण्यात येईल.
प्लॅस्टिक, बायो कचरा वेगळा करणे
कचऱ्यापासून खतासह अन्य प्रकल्प राबवण्यात येणार आहे
शासनाच्या पाठपुरवठा करून या सर्व कामांसाठी शासकीय जमीन उपलब्ध करून घ्यायची आहे.
विकासकामे –
गावातील अंतर्गत रस्ते
कचरा व्यवस्थापन
पथदिवे
सांडपाणी व्यवस्थापन, पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सुधारणा
बेरोजगार तरुणांना विविध कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून दिला
महिंद्रासारख्या मोठ्या कंपनीत 30 ते 40 तरुणांना पर्मनंट कामगार म्हणून कायमस्वरूपी नोकरी मिळवून दिली
ग्रामपंचायतीमार्फत होणारी विविध लोकोपयोगी कामे त्यांच्या उपसरपंचपदाच्या कार्यात झाली.
संकलन : सुनील बटवाल, चिंबळी