आपण ज्या गावात जन्मलो त्या गावासाठी काही तरी भव्यदिव्य करावे, गावाचा विकास झाला तर राज्याचा अन् देशाचा विकास होईल. गावाचा विकास करून गाव स्वयंपूर्ण बनवणे. गावात विकास योजना राबवून या विकासाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून लोकांचे जीवनमान उंचावणे आणि आपले गाव हेच आपले कुटुंब समजून एक विकासकामांचा धडाका लावला आहे, तो नागापूर (ता. आंबेगाव) येथील जनतेने बिनविरोध निवडून दिलेल्या सुशिक्षित तरुण सरपंच गणेश यादव यांनी समाजसेवेचा एक आदर्श तरुणांपुढे ठेवला आहे.
आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथील छोट्याशा गावातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात गणेश यादव यांचा जन्म झाला. वडील अर्जुन यादव यांनी हे शेतीव्यवसाय करीत असताना गावच्या धार्मिक व सामाजिक तसेच विकासकामात सहभागी होत असत. त्यांनी गावचे उपसरपंच पदावरही काम केले होते. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने शिक्षण घेण्यासाठी लहानपणीच गणेश यादव हे चुलते मारुती यादव यांच्याकडे मुंबईला गेले व महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेऊ लागले. दहावीपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले. त्यानंतर ते गावी आले व रांजणी येथील नरसिंह विद्यालयात 12 वीचे शिक्षण पूर्ण केले व मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात वाणिज्य शाखेची पदवी घेतली. त्यानंतर कायद्याचे (वकिली) शिक्षण घेण्यासाठी पुणे येथे गेले; परंतु आर्थिक परिस्थितीमुळे कायद्याचे शिक्षण अर्धवट सोडून गावी यावे लागले.
कुटुंबाला हातभार लागावा म्हणून गणेश यादव यांनी शेतीव्यवसायाला जोडधंदा म्हणून रांजणी येथे कांदा, बटाटा भरण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या (बारदान) विक्रीचा व्यवसाय सुरू केला. तो दोन वर्षे केला. व्यवसायामध्ये यश मिळत असल्याने हुंडेकरी सुरू केली. त्याचबरोबर वाहतूक व्यवसाय सुरू करण्यासाठी चारचाकी वाहन विकत घेऊन तरकारी माल, कांदा-बटाटा पुणे, मुंबई येथील बाजारपेठेत नेण्यात आले. शेतात कांदा, बटाटा, तरकारी माल, पालेभाज्या, फुलाचे व ऊस ही पिके घेण्यात येतात. या सर्व व्यवसायात चांगले पैसे मिळत होते. त्यानंतर बोअरवेलचा व जेसीबी, पोकलेन विकत घेऊन व्यवसाय सुरू करण्यात आला. हे सर्व व्यवसाय करीत असताना त्यांचे लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध आले.
सरपंचपदी बिनविरोध निवड
गावात सामाजिक कार्य करत असताना माजी सभापती देवदत्त निकम यांच्या संपर्क आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील अनेक विकासकामे राबविण्यात येत आहेत. कामाची पोचपावती म्हणून ग्रामस्थांनी त्यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी तसेच सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. यावेळी सोसायटीची नवीन इमारत बांधण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांनी गावच्या सरपंचपदाची निवड बिनविरोध केली आणि गावात विकासकामे सुरू केली. गावातील लोकांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून दोन कोटी रुपयांची जलजीवन मिशन ही पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. ही योजना लवकरच पूर्ण होणार आहे. तसेच गावातील वाड्यावस्त्यांवरील रस्त्यांची कामे करण्यात आली. सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येत आहे. विधवा प्रथा बंद करून महिलांना त्यांनी धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी करून घेतले.
भविष्यातील विकासकामे
गावची शेतजमीन असून यामध्ये शेततळे आहे. या शेततळ्याचे खोलीकरण करण्यात येणार आहे. यामुळे गावातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. गावात आरोग्य उपकेंद्र इमारत, तलाठी इमारत, पोस्ट ऑफिस आणणार तसेच ग्रामपंचायत डिजिटल करण्यात येणार आहे. थापलिंग देवस्थान परिसर सुशोभिकरण करून देवस्थानचे अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मंगलकार्य बांधण्यात येणार आहे. सौरऊर्जेचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
यांचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. गावात बंदिस्त गटार योजना व सिमेंटचे रस्ते तसेच परसबागेची निर्मिती करण्यात येणार आहे. समाज मंदिरे बांधण्यात येणार आहे. तसेच गावातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात येणार असून गाव हिरवे गार करण्याचे येणार आहे. नागापूर हे एक आदर्श गाव निर्माण करण्याचा संकल्प आदर्श तरुण सरपंच गणेश यादव यांनी व्यक्त केला आहे.
समाजसेवेचे बाळकडू घरातूनच
घरामध्ये धार्मिक, राजकीय, सामाजिक पार्श्वभूमी असल्याने सरपंच गणेश यादव यांना समाजसेवेची आवड निर्माण झाली. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना मुलांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आंदोलनात भाग घेतला होता. गावातील गणेशोत्सव मंडळात सहभाग घेऊन धार्मिक कार्यक्रम, व्याख्याने असे कार्यक्रम राबवले तसेच सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. थापलिंग यात्रेची व्यवस्था, नियोजन कामात सहभाग व अखंड हरिनाम सप्ताहाच्या कामात ते मदत करतात.
सहकाऱ्यांशिवाय विकास अवघडच
गावच्या विकासगाडा पुढे न्यायचा असेल तर सहकाऱ्यांची खंबीर साथ मिळणे आवश्यक आहे. हीच साथ सरपंच गणेश यादव यांना गावातून मिळाली. गावचे उपसरपंच भरत म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य मंदा भारमळ, प्रकाश पवार, शंकर रिठे, मनिषा निकम, वैशाली पोहकर, अनिता भोर, सुनील शिंदे, सुजाता रिठे यांच्या पाठिंब्यामुळे गावात समन्वयातून सर्वांगीण आणि सर्वच भागात विकासकामे वेगाने होत आहेत.
संकलन : लक्ष्मण ढोबळे