नवी दिल्ली : करोना चाचणी केल्यानंतर उशिराने चाचणी अहवाल येत असल्याने अनेकदा रुग्णांचे उपचार सुरू होण्यास विलंब होतो. त्यामुळे अँटीजेन टेस्ट करण्यात येत होत्या. मात्र अँटीजन टेस्टवर अनेकदा संशय व्यक्त करण्यात येत होता. आता करोना टेस्ट करण्यासाठी नवीन टेस्ट पद्धती शोधण्यात आली असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) या नव्या ‘सलाईन गार्गल आरटी-पीसीआर’ पद्धतीला मंजुरी देण्यात आली आहे.
नव्या पद्धतीच्या चाचणीमुळे नागरिकांना केवळ तीन तासांत करोना चाचणीचा अहवाल मिळणार आहे. चाचणीची ही नवी पद्धत पायाभूत सुविधा कमी असणाऱ्या ग्रामीण भागांत तसंच पोहचण्यासाठी अतिशय दुर्गम भागांना अधिक फायदेशीर ठरू शकेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) अंतर्गत नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI) च्या शास्त्रज्ञांनी चाचणीच्या या पद्धतीसहीत एका नवा टप्पा गाठला आहे.
सलाईन गार्गल आरटी-पीसीआर या पद्धतीच्या चाचणीत, रुग्णांना खारट पाण्याची गुळणी करून ती एका सामान्य ‘कलेक्शन ट्यूब’मध्ये जमा केली जाते. हा नमुना लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवला जातो. एका विशिष्ट तापमानात, NEERI कडून तयार करण्यात आलेल्या एका विशिष्ट सोल्युशनमध्ये हा नमुना ठेवला जातो. सोल्युशन गरम केल्यानंतर एका ‘RNA’ टेम्प्लेट तयार होतं. त्यानंतर या सोल्युशनवर ‘आरटी-पीसीआर’ प्रक्रिया केली जाते.
#United2fightCorona@CSIR_NEERI has developed ‘Saline Gargle #RTPCR Method’ for testing #COVID19 samples; you can get the result within 3 hours
Watch Dr. Krishna Khairnar, Senior Scientist, Environmental Virology Cell, NEERI explaining how to use👇@IndiaDST@CSIR_IND pic.twitter.com/mxpYTlt7lC
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) May 28, 2021
दरम्यान चाचणीच्या या नव्या पद्धतीत नमुने गोळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करणं खूप स्वस्त पडतं, असं ‘नीरी’चे पर्यावरण विषाणू कक्षाचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. कृष्णा खैरनार यांनी म्हटलं. ते पुढं म्हणाले की, लोक स्वतःहून करोना संसर्गाची चाचणी करू शकतील कारण ही प्रक्रिया ‘सेल्फ सॅम्पलिंग’ला परवानगी देते.
चाचणीसाठी नमुने देताना नागरिकांना चाचणी केंद्रांवर वाट पाहण्याची किंवा गर्दीत उभं राहण्याची गरज लागणार नाही. या पद्धतीत कमीत कमी कचरा निर्माण होतो. तसेच संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी ही पद्धत फायदेशीर ठरेल, असंही डॉ. खैरनार यांनी सांगितलं.