मुंबई – देशातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धरावीत आठ लाख 50 हजार नागरिक राहतात. येथे प्रती चौरस किमीमध्ये लोकसंख्येची घनता तीन लाख 54 हजार 167 इतकी आहे. मात्र असं असलं तरी या भागात करोनाच्या दुसऱ्या लाटेत फार जणांना संसर्ग झाला नाही.
यामागे नेमके काय कारण आहे याबाबतचे संशोधन युरोपीयन जर्नल ऑफ मेडिकल अँड हेल्थ सायन्समध्ये शनिवारी प्रकाशित करण्यात आले आहे.
या संशोधनाद्वारे येथील रहिवाशांमध्ये नैसर्गिकपणे झालेल्या संसर्गामुळे मोठ्या संख्येने प्रतीपिंडे (अँटीबॉडीज) तयार झाली होती, असा दावा करण्यात आला आहे.
धारावीमध्ये यावर्षी एप्रिल महिन्यात प्रती दहा लाख लोकांमागे केवळ सात बाधीत निघाले होते. त्यावेळी महाराष्ट्रात प्रती दहा लाख नागरिकांमागे 307 तर भारतात 257 असे प्रमाण होते. त्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला होता. औषधे आणि रुग्णालयातील बेडची कमतरता कटाक्षाने जाणवत होती.
धरावीमध्ये गेल्या वर्षी मे महिन्यात प्रती दहा लाख नागरिकांमागे 48 बाधीत एवढे करोना बाधित आढळले होते. काही दिवस हे प्रमाण 80 इतके अधिक झाले होते. त्यावेळी देशातील प्रमाण प्रती दहा लाख एक ते तीन एवढेच होते.
धारावीत सेरोपॉझिटिव्हिटीचे प्रमाण खूप जास्त आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात हे प्रमाण 57 टक्के होते. ते ऑक्टोबर महिन्यात 45 टक्क्यांएवढे कमी झाले. त्यामुळे प्रतीपिंडाचे प्रमाण कमी होत असल्याची भीती संशोधकांना वाटत होती.
कफपरेड झोपडपट्टीत ऑक्टोबर 2020 मध्ये केलेल्या सेरोसर्वेक्षणात प्रतीपिंडे 75 टक्के नागरिकांमध्ये आढळून आली. त्यामुळे त्यावेळी धरावीत 70 ते 80 टक्के नागरिकांचा सेरोपॉझिटिव्हिटी असावी. त्यातून तेथे सामुहिक प्रतिकारशक्ती तयार झाली असावी, अशी शक्यता या संशोधनात व्यक्त करण्यात आली.
हे संशोधन जपानमधील फूड अँड एनर्जी सेक्युरिटी सेंटर आणि दिल्लीस्थितव डॉ. दीपाली भारद्वाज यांनी केले.