मुंबई – न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना तसेच त्यानंतर इंग्लंडविरुद्ध होणारी कसोटी मालिका भारतीय संघाला जिंकणे कठीण जाणार आहे. करोनाच्या धोक्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंना सराव सामना मिळालेला नाही आणि हीच गोष्ट भारतासाठी चिंतेची बाब ठरू शकते, असा इशारा निवड समितीचे माजी अध्यक्ष व माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी दिला आहे.
नेटमधील सराव तसेच सराव सामने मिळाले नसल्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसह संपूर्ण संघासाठी चिंतेची बाब बनू शकते. कोहली बराच काळ टीमबरोबर होता आणि सध्या तो जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे.
कोहली आणि रोहित हे जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. चांगली गोष्ट म्हणजे दोघेही चांगल्या लयीत आहेत. पण सामन्यांच्या अनुभवाअभावी त्यांच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. इंग्लंड दौऱ्याच्या सुरुवातीच्या कसोटीतही याचा परिणाम होऊ शकतो.
न्यूझीलंड संघ आधीच तेथे खेळत असल्याने त्यांचा फायदा होईल, असेही ते म्हणाले. कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्ध 18 ते 22 जून या कालावधीत हा सामना होणार आहे.