मुंबई :- भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेची तिकीट विक्री येत्या 25 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले आहे. ही स्पर्धा येत्या 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत देशतील दहा मैदानांवर रंगणार आहे.
क्रिकेटप्रेमींना दोन पद्धतीने तिकीट खरेदी करता येतील. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने तिकीट उपलब्ध आहेत, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली. आयसीसीच्या वेबसाइटवरून ऑनलाइन तिकिटे खरेदी करू शकतात. साखळीतील तिकीट विक्री 25 ऑगस्टपासून सुरू होणार असली तरीही उपांत्य लढती व अंतिम लढतीची तिकीट विक्री 15 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
आयसीसीच्या वेबसाइटव्यतिरिक्त अन्य मार्गानेही ऑफलाइन तिकीट उपलब्ध होतील. जे ऑनलाइन तिकीट आरक्षित करतील, त्यांना स्टेडियममध्ये तिकिटाची प्रिंट सोबत ठेवणे बंधनकारक असेल. सामन्यांच्या तिकिटासाठी आयसीसीच्या वेबसाइटवर 15 ऑगस्टपासून नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केल्यानंतर आयसीसीकडून पुढील पाठवली जाणार आहे.
भारताच्या सामन्यांची तिकिटे 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यान खरेदी करता येतील. मात्र, भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याची तिकीटे 3 सप्टेंबरलाच खरेदी करता येणार आहे.
आयसीसीने या स्पर्धेचे नवे वेळापत्रक बुधवारी जाहीर केले असून त्यातील 9 सामन्यांच्या तारखांमध्ये बदल केला गेला आहे.
या 9 पैकी 2 सामने भारतीय संघाचे आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 15 ऑक्टोबरला होणारा सामना आता 14 ऑक्टोबरला होणार आहे. तर भारत विरुद्ध नेदरलॅंड यांच्यातील सामना 12 नोव्हेंबरच्या जागी 11 नोव्हेंबरला होणार आहे.
भारताच्या सामन्यांचे तिकीट विक्रीचे वेळापत्रक
– भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 31 ऑगस्ट
– भारत विरुद्ध अफगाणिस्तान – 31 ऑगस्ट
– भारत विरुद्ध बांग्लादेश – 31 ऑगस्ट
– भारत विरुद्ध इंग्लंड – 1 सप्टेंबर
– भारत विरुद्ध न्यूझीलंड – 1 सप्टेंबर
– भारत विरुद्ध श्रीलंका – 1 सप्टेंबर
– भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 2 सप्टेंबर
– भारत विरुद्ध नेदरलॅंड – 2 सप्टेंबर
– भारत विरुद्ध पाकिस्तान – 3 सप्टेंबर