दुबई – भारतातील करप्रणाली तसेच महसुलातील वाट्याचे प्रमाण यावरून आता आयसीसी आक्रमक झाली आहे. बीसीसीआयने याबाबत देशातील सरकारशी बोलणी करून मार्ग काढला नाही तर भारतात होणारी 2023 मधील एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा भारतातून अन्यत्र हलवण्यात येईल, असा गर्भीत इशाराही आयसीसीने दिला आहे.
या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असले तरीही भारतातील करप्रणाली व महसुलातील वाटा याबाबत यापूर्वीही बीसीसीआय व आयसीसी यांच्यात वाद घडले आहेत. 2016 साली पहिल्यांदा हा वाद निर्माण झाला होता. यातून मार्ग निघाला नव्हता व भारताच्या यजमानपदात झालेल्या त्या सालातील टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या महसुलातून आयसीसीने बीसीसीआयचे तब्बल 190 कोटी रुपये काढून घेतले होते.
आताही तेच घडले तर विश्वकरंडक स्पर्धेच्या एकूण नफ्यातून बीसीसीआयला तब्बल 900 कोटी रुपयांचा फटका बसू शकतो. कराच्या प्रश्नावरून आता या दोन संघटनांतील वाद पुन्हा एकदा जोर धरत असल्याचेही समोर येत आहे. आयसीसीचे मुख्यालय काही वर्षांपूर्वी लंडनमध्ये होते. इंग्लंडच्या करप्रणालीतून काही तोडगा निघू शकला नाही व आयसीसीने त्यांचे मुख्यालय लंडनवरून दुबईत हलवले. त्यामुळे याबाबत आता कोणताही समझोता होणार नाही, असा थेट इशारा आयसीसीने बीसीसीआयला दिला आहे.
स्पर्धा ज्या देशात असते त्या देशातील सरकारने करात सवलत देणे बंधनकारक असते, असे आयसीसीचे धोरण आहे. मग जर बीसीसीआय यातून मार्ग काढू शकली नाही तर त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होऊ शकते. आता या महिन्याच्या अखेरीस बीसीसीआयची आयसीसीबरोबर बैठकही होण्याची शक्यता असून, त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
पाक मंडळाकडूनही वादात भर
आशिया करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात येऊन खेळण्यास नकार देत असेल तर आमचा संघही भारतात विश्वकरंडक स्पर्धेसाठी येणार नाही, असा इशारा पाकिस्तान क्रिकेट मंडळाने दिला होता. तसेच या संपूर्ण प्रकरणात आयसीसीने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही केली होती. त्यामुळे एकीकडे महसूल व करप्रणालीवरून आयसीसी आक्रमक झालेली असताना पाक मंडळाच्या इशाऱ्यामुळे या वादात भरच पडणार आहे. भारत सरकार संघाला पाकिस्तानात स्पर्धेत सहभागीची परवानगी देणार का, असाही प्रश्न आहे. सध्या तरी बीसीसीआयला या दोन्ही आघाड्यांवर लढा द्यावा लागणार, असेच दिसत आहे.