ललीत केदारे
प्रत्येकामध्ये फोफावलेला “मी’पणा म्हणजे सो कॉल्ड “इगो’, शब्द फार छोटा आहे, मात्र काम फार मोठे करतो. ज्याने “मी’ला बाजूला सारले. त्याची लाइफलाइन नक्कीच सुरळीत असेल. प्रत्येक नात्याला गरज असते ती माणुसकीची, म्हणजे नेमकी कसली? एकमेकांच्या साथीची सुख असो वा दु:ख प्रत्येकाने एकमेकांसोबत असणे फार महत्त्वाचे आहे.
मी काय आणि तुम्ही काय दैनंदिन जीवनात सर्वांनाच आता “इगो’ नावाचा राक्षस सतावत आहे. मी केलं मग त्यानं का नाही?, मी का करू पहिले तो करेल, लहान असो की मोठा, मित्र असो वा मैत्रीण, सून असो वा सासू, काका असो की पुतण्या प्रत्येक नात्यात हा “इगो’ मोठी अडचण बनून बघता बघता नाते उद्ध्वस्त करायला निघालाय.
समाज म्हटला, नातेगोते म्हटले, तर एकमेकांना भेटणे, बोलणे, चाली-रीती, परंपरा अशा अनेक गोष्टी ह्या समाजाला बांधून ठेवतात. पण आज चित्र मात्र फार भयानक झालेलं दिसतं. नातेवाईक, मित्र परिवार फक्त म्हणायला म्हणून भेटतात. पण तो स्वतःहून बोलला नाही मग मी का बोलू? त्याने नमस्कार घातला नाही मग मी का घालू? अशा “इगो’मुळे माणसं एकमेकांपासून दुरावताना दिसतात.
आज प्रत्येक माणूस हा स्वतःच्या जगण्यात इतका रमला आहे की त्याला कुणाचीच गरज नसल्याचं तो भासवत असतो. मुळात तो खूप एकटा पडलेला आहे. मनातून खचलेला, स्वतःचे दु:ख स्वतःलाच सांगत बसलेला. तो सांगेल तरी कोणाला? कारण त्याचा “इगो’ त्याला फार प्रिय झालाय. मी माझे प्रॉब्लेम, दु:ख का कोणाला सांगू, मला काही कुणाची गरज नाही असे तो स्वतःला समजावतो आणि हेच समजवता समजवता त्याला एकटं राहण्याची सवय कधी लागते हे त्यालाही कळत नाही.
मोबाइल, टीव्ही, इंटरनेट अशा माध्यमांच्या मदतीने तो ते दु:ख विसरतोही, मात्र आपला “इगो’ कधी बाजूला ठेवत नाही. याच साधनाचा जर चांगला उपयोग करायचा म्हटलं तर समाज खूप जवळ येईल. सर्व आनंदात एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होतील आणि जीवन खूप सुंदर बनेल. आजच्या दगदगीच्या जीवनात फार लवकर कोणाला भेटणं शक्य होत नाही. मात्र नुसता एक फोन जरी कुणाचा आला तर भेटण्यापेक्षा जास्त आनंद होतो. मनातून जर खरंच कुणाला कुणाची काळजी वाटत असेल तर तू-तू मै-मै करण्यात खरंच कुणाचा फायदा नाही. जर आपण कुणाच्या फोनची अपेक्षा करत असू तर कधी तरी आपणही त्याला एक कॉल करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे “इगो’ निर्माण होणार नाही. तुमच्या प्रत्येकांच्या मनात आता एक गोष्ट आली असेल, कॉल फार करून झालेत तरी त्याने/तिने आजवर माझी हालचाल विचारण्यासाठी एकही कॉल केला नाही म्हणून आता मी कॉल करणे बंद केले आहे.
तुमच्या मनात असे येणे साहजिकच आहे. त्यावर एक उपाय आहे, वयाने मोठे असतील तर त्यांची काळजी घेण्यात तुम्हाला आनंद वाटायला हवा, आपण भारतात राहतो म्हणून मुद्दाम सांगेल, मानाने मोठे असणाऱ्यांची देखील काळजी घेण्यात आपल्याला आनंद वाटायला हवा. कारण कधीतरी तुम्ही देखील त्या मानाचे मानकरी ठरणार आहात हे विसरू नका. राहिला प्रश्न समवयस्की, मित्र, नातेवाईक ह्यात मात्र एकमेकांनी एकमेकांबद्दल “इगो’ बाजूला ठेवायला हवा.
भारतात दर 100 जोडप्यांमागे 20 जोडप्यांचे घटस्फोट होण्यामागे कारण आहे तो “इगो’. नवरा बायको एकमेकांवर फार प्रेम करतात. घरात बाकी सर्व काही खूप छान चाललं असतं परंतु या “इगो’मुळे ते एकमेकांना सोडायलाही तयार होतात आणि नंतर स्वतःला दोष देत आयुष्य काढतात. बघायला गेलं तर आयुष्य खूप छोटं आहे. कधी कुणाचं काय बरेवाईट होईल हे कुणीच सांगू शकत नाही. नाते जोडणे आणि नाते टिकवणे हे आपल्या सर्वांच्या हातात आहे. फक्त एकदा तुमच्यातला “मी’ला बाजूला ठेवा म्हणजे “तो’ तुमच्या जवळ येईल. नात्यात वाईट कोणीच नसतं, हो फक्त आपल्यातला संवाद संपत चाललाय आणि जर नात्यात संवाद नाही तर ते नातं फार काळ टिकत नाही.
सध्या करोना विषाणूने हैराण करून सोडलंय म्हणून प्रत्येक व्यक्ती आपापल्या घरात बसलीय, सर्वांकडे खूप वेळ आहे. ह्या वेळेचा सदुपयोग करा, सर्वांनी एकमेकांसोबत बोला, एक काळजीचा फोन तुमच्याकडून जाऊ द्या. नाते म्हणजे आयुष्य आणि आयुष्य म्हणजे नाते हे समजून घ्या. छोट्यामोठ्या चुका पदरात घ्या. मन मोठ करून सर्वांना जवळ करा!