मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात सत्तासंघर्षाचा दुसरा अंक सर्वांना पाहायला मिळाला. बंडखोरीनंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ‘घड्याळ’ या पक्षचिन्हावर दावा केला आहे. याबाबतचे पत्रही निवडणूक आयोगाला दिले आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले असून, त्यामुळे राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलत चालल्याचे चित्र दिसून येत येत आहे.
वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत आपल्या 40 आमदारांसह भाजपची साथ धरली. आता आठ, दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार बाहेर पडले अन् त्यांच्या गटातील नऊ आमदारांसह सत्तेत आले. दरम्यान, आता या सर्व राजकीय घडामोळींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
“राज्यात जो राजकीय व्याभिचार सुरु आहे तो मी करणार नाही. मला तडजोड करावी लागली तर मी घरात बसेन पण तडजोड करणार नाही.” – सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे (रत्नागिरीतील महाराष्ट्र सैनिक मेळाव्यात) #कोकण_दौरा #मनसेचंकोकण pic.twitter.com/DDxqJ6JnYb
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 13, 2023
पक्षातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरेंनी सद्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. “राज्यात जो राजकीय व्याभिचार सुरु आहे तो मी करणार नाही. मला तडजोड करावी लागली तर मी घरात बसेन पण तडजोड करणार नाही”, असे राज यांनी रत्नागिरीतील महाराष्ट्र सैनिकांच्या मेळाव्यात म्हटले. राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज ते चिपळूणमध्ये आहेत. त्यानंतर ते खेड आणि दापोलीला भेट देणार आहेत. या कोकण दौऱ्यात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पक्ष बांधणीसाठी राज ठाकरे कोकणात आले आहेत.