अकोले – अगस्ती कारखान्यावर प्रशासक येणार नाही. सीताराम गायकर यांनी कर्ज उपलब्धतेसाठी प्रयत्न करावे, आपण सरकार पातळीवरील येणारी अडचण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून सोडवून मदत मिळवू, कारखान्याचे रोप लावले आहे ते वाचविण्याचे कामही मीच करणार, असा निर्धार माजीमंत्री व कारखान्याचे अध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी व्यक्त केला.
अगस्ती कारखान्याची 17 जुलै रोजी होणारी निवडणूक स्थगित झाल्यानंतर अगस्तीच्या हंगामाचा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी शेतकरी विकास मंडळाचे वतीने पिचड यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांचा मेळावा महाराजा लॉन्स येथे झाला. यावेळी पिचड बोलत होते. जेष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत, निवृत्त प्रशासक बी. जे. देशमुख, माजी आमदार वैभवराव पिचड, जि.प.सदस्य जालिंदर वाकचौरे, दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, बाजीराव दराडे, शिवाजीराजे धुमाळ, अकोले एज्युकेशन अध्यक्ष सुनिल दातीर, नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी उपस्थित होते.
पिचड म्हणाले, कारखान्याची निवडणूक लागली तेव्हा कोणते सरकार होते? हे तीन पायाचे सरकार असताना आपण निवडणूक व सहकार विभागाला विनंती पत्र देऊन निवडणूक नोव्हेंबरनंतर घेण्यात यावे अशी मागणी केली होती, मात्र त्यांनी आपल्याला कोर्टात जाण्याचा सल्ला देवून निवडणूक कार्यक्रम या तीन पायाच्या सरकारने जाहीर केला.
कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी, यात राजकारण आणू नये. यात आमदार लहामटे, अशोक भांगरे, अजित नवले, सीताराम गायकर यांनी विरोध करुन खोडा खातला. कोपरगाव तालुक्यात आ. काळे व कोल्हे दोन्ही राष्ट्रवादी, भाजप अशा विरूद्ध पक्षात आहे.एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवतात, मात्र कारखाना चालावा म्हणून दोघांनी समजूतदारपणे कारखाने बिनविरोध केले मग आपला अगस्ती का होऊ शकला नाही. आता तालुक्यातील हे टोळीचे राजकारण व बिनविरोधला खोडा घालणाऱ्यांना कायमचे घरी बसवण्यासाठी आपण शेतकरी विकास मंडळाचे पॅनल उभे केल्याचे पिचडांनी सांगितले.
वैभवराव पिचड म्हणाले, रेमडिसिव्हर घोटाळा, रेशन घोटाळा तसेच अडीच वर्षात चार दारूच्या दुकानाची परवाने कशी मिळाली यावर का बोलत नाही. आज तालुक्यातील गोरगरिबांचे ठेवी पतसंस्थेत आहे.या पतसंस्थेच्या कारभारापायी काही शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या तर काहींना आत्महत्त्या करायची वेळ आली. या पतसंस्था गोरगरीबांना लुटण्याचे काम करत असेल तर चौकशी केली तर काय बिघडेल.
दशरथ सावंत म्हणाले, या टोळीला पुन्हा कारखान्यात येऊ नये म्हणून आम्ही शेतकरी विकास मंडळाला पाठिंबा दिला आहे. तसेच गायकरांनी बॅंकेत केलेले पाप कोर्टापुढे आणुन त्यांना एक दिवस जेलमध्ये घालणार असा दावा केला आहे.