नवी दिल्ली – काल (दि. 10 जून) दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मोठी घोषणा केली. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.
यासोबतच पक्षातील इतर काही नेत्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवण्याचीही घोषणा यावेळी पवारांनी केली आहे. मात्र, यामध्ये अजित पवार यांचे नाव नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यावेळी शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. तसेच खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, शरद पवरांच्या या घोषणेनंतर माध्यमांनी अजित पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता. यावेळी मात्र, अजित पवार यांनी माध्यमांशी कुठलाही संवाद न साधता तेथून निघून गेले. तसेच शरद पवार यांच्या घोषणेनंतर पक्षाच्या झालेल्या बैठकीत ते नव्हते. यामुळे ते नाराज आहे का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
दरम्यान, आता सर्व अफवांना स्वतः अजित पवार यांनी पूर्ण विराम दिला आहे. आज अजित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेत माध्यमांकडे आपली भूमिका मांडली. यावेळी अजित पवार म्हणाले, “मी सुप्रिया सुळे यांच्या निवडीवर नाराज नाही. राज्यात माझ्यावर विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी दिली आहे.
मला राष्ट्रीय राजकारणाची आवड नाही. माझी कामाची पद्धत आणि राष्ट्रीय पातळीवरील कामाची पद्धत यामध्ये फरक मोठा आहे. त्यामुळे 30 ते 35 वर्षांपूर्वीच मी ठरवले की मी राज्याच्या राजकारणात राहणार आहे. मी नाराज असल्याच्या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नाही’. असं अजित पवार म्हणाले.