नारायणगाव – शिवसेना उपनेते व शिवव्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशाहीचे महत्त्व सांगणारी शिवसेनेची “मी महाराष्ट्र’ मोहीम बुधवारी (दि. 18) आळेफाटा व चाकण येथे आयोजित केल्याची माहिती शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
14 सप्टेंबरपासून औरंगाबाद येथून सुरुवात झालेली ही मोहीम संपूर्ण राज्यभरात 24 जिल्ह्यांत राबविली जाणार आहे. 18 सप्टेंबर रोजी जुन्नर व खेड तालुक्यात या मोहिमेद्वारे भव्य सभा होईल. यादिवशी सकाळी 1assembly elec0 वाजता मार्केटयार्ड आळेफाटा (ता. जुन्नर) येथे व सायंकाळी 4 वाजता भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय, चाकण (ता. खेड) या ठिकाणी आयोजित सभांद्वारे प्रा. नितीन बानगुडे पाटील नागरिकांना मार्गदर्शन करतील. या मोहिमेच्या माध्यमातून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशाहीची महती सांगणार आहेत.
तसेच सर्वांसाठी समानता, सबलीकरण व कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसलेल्या समाजाचे महत्व विषद करून शिवशाहीचा सुवर्णकाळ परत आणण्याचे उद्दिष्ट लोकांपर्यंत पोहोचविले जाणार आहे. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, खेडचे आमदार सुरेश गोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख माऊली कटके आदी मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. शिवशाहीचे महत्व सांगणाऱ्या “मी महाराष्ट्र’ या मोहिमेमध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष, युवासेना, महिला आघाडी, सर्व अंगीकृत संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी तसेच तमाम शिवसैनिकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.