कोपरगा , (प्रतिनिधी): – ज्यांच्याकडे ४० वर्ष सत्ता होती, त्यावेळी त्यांनी किती प्रश्न सोडविले व चार वर्षात मतदार संघातील किती प्रश्न सुटले हे मतदार संघातील जनतेने पाहिले आहे. त्यामुळे मागील चार वर्षातील कामगिरीवर जनता समाधानी आहे. परंतु ज्याचे अस्तित्व संपत चालले आहे, त्यांच्याकडून स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी उगाचच आकांडतांडव करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मात्र, जनता माझ्यासोबत असल्यामुळे त्यांचे मनसुबे कधीच पूर्ण होणार नाहीत. जनतेची काळजी घेण्यासाठी आपण सक्षम असून विरोधकांना मात्र त्यांच्या राजकीय अस्तित्वाची चिंता पडली असल्याची बोचरी टीका आ.आशुतोष काळे यांनी कोल्हेंवर केली.
कोपरगाव तहसील कार्यालयात आ.आशुतोष काळे यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नागरिकांना मिळणाऱ्या विविध शासकीय लाभाच्या योजनांचा आढावा घेतला.यावेळी गरजू पात्र लाभार्थ्यांच्या ८११ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यावेळी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. काळे म्हणाले की, चारच वर्षात जवळपास ८ हजार ५३५ पात्र गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. याउलट २०१४ ते २०१९ या पाच वर्षात हा आकडा मात्र २ हजार १११ एवढाच असून मागील चार वर्षातील आकडा विरोधकांच्या पाच वर्षांच्या आकड्यापेक्षा चारपट जास्त आहे.
विकासाच्या बाबतीत मतदारसंघाचा झालेला विकास, सुरू असलेली विकासकामे व मतदारसंघाचा बदलेला चेहरामोहरा विरोधकांना देखवत नाही. ज्यांना स्विमिंग पूल बांधता आला नाही, बसस्थानकाचे काम करता आले नाही. नागरिकांच्या गरजा ज्यांना ओळखता आल्या नाही, त्यांनी दिशाभूल करू नये. जनता त्यांच्या भूलथापांना कधीच बळी पडणार नाही. जनतेचे प्रश्न सुटले तर राजकारण संपणार आहे.
मग कोणत्या प्रश्नावर राजकारण करायचे? याचा प्रश्न विरोधकांना पडल्यामुळे नागरिकांचे प्रश्न सुटूच नये, यासाठी त्यांचा आटापिटा सुरु असल्याची टीका केली. एका बाजूने विकासकामे होऊ नये यासाठी खोडा घालायचा व दुसरीकडे जनतेत संभ्रम निर्माण करायचा, अशी दुटप्पी भूमिका घेऊन विरोधक आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहे. विकासाच्या आड येणाऱ्यांच्या मनसुब्यावर जनताच पाणी फेरणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले.