पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्याच्या पर्यटन विकास आराखड्यामध्ये महाबळेश्वर, प्रतापगड, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा समावेश आहे. येथे या आराखड्यानुसार कामे करताना मूळ वास्तू आणि परिसराच्या सुशोभीकरणाची कामे नैसर्गिक रंग वापरावा. बांधकामाचे साहित्य पर्यावरणपूरक असावे.
या परिसराचे मूळ सौंदर्य राखले जाईल, अशी कामे प्रस्तावित करावीत. हे प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
प्रतापगड किल्ला जतन आणि संवर्धन या बाबी लक्षात घेऊन गडावर जाणारे व येण्याचे मार्ग, बुरुज व तटबंदी बांधकाम, किल्ल्यावर झालेल्या पडझडीच्या दुरुस्तीची कामे, पर्यटकांसाठी सोयीसुविधा या सर्व कामांचा पर्यटन विकास आराखड्यामध्ये समावेश करावा. किल्ल्याचे मूळ सौंदर्य कोणत्याही प्रकारे खराब दिसू नये याची खबरदारी घ्यावी. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पर्यटन विकासाची कामे करताना या परिसरातील जैवविविधता राखली जावी. स्थानिक कृषी पर्यटनाला चालना मिळावी, स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या गोष्टी लक्षात घ्याव्यात, अशा सूचना पवार यांनी दिल्या आहेत.