नवी दिल्ली – आजवर चुल आणि मुल सांभाळणाऱ्या महिलांनी रणरागिणींचा अवतार घेत शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला आहे. दिल्लीच्या सीमांवर हरियाणा आणि पंजाबमधून शेकडो महिला आल्या आहेत.
केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत म्हणून त्यांचे पती, पुत्र आणि बांधव आंदोलनात या पुर्वीच सहभागी झाले आहेत. आता त्यांच्या खांद्याला खांदा लावत त्या लढ्यात उतरल्या आहेत. आपल्या गावातून या महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीच्या सीमांकडे येत आहेत.
शेती व्यवसाय काही लैंगिकतेवर आधारित नाही. जर पुरूषाने किंवा महिलेने पेरणी केली तर शेत काही वेगळे धान्य देत नाही. त्यामुळे पुरूष शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर आम्ही घरी का बसायचे ? असा सवाल लुधियानातील शेतकरी असणाऱ्या मनदीप कौर यांनी केला. त्या सींघू सीमेवर बसने आल्या.
दिवस आणि रात्रभर निदर्शनांत सहभागी होऊन परतल्या. त्या म्हणाल्या, “मी परत येणार आहे. आमचा लढा आणि आमचे घर या दोन्हीकडे आम्हाला पहावे लागते. मी येथे येण्याआधी शेताला पाणी पाजून आले होते. आमची शेती मला जगवायची आहे.’
या आंदोलकांची पंजाबमधून दिल्लीत येणाऱ्या टीकरी अणि सिंघू सीमेवर पुरूष शेतकरी तळ ठोकून आहेत. तर महिला येतात, आंदोलनात सहभाग घेतात आणि परत जातात. त्या घर आणि शेत दोन्ही सांभअळतात. मनदीप या त्यांच्या शेजारी सखिविंदर कौर यांच्यासह पाच तास बसचा प्रवास करून आल्या होत्या.
माझा भाऊ आणि पुतण्या येथे थंडीत आंदोलन करत असताना एक दिवससुध्दा मला सुखाची झोप लागली नाही. येथे आंदोलनात आल्यानंतर पहिल्यांदा मला झोप लागली, असे विधवा असणाऱ्या 68 वर्षीय सुखविंदर यांनी सांगितले.
खालसा एड या आंतरराष्ट्रीय संस्थेने पुरवलेल्या तंबूत या महिला राहतात. त्या म्हणतात, येथे शौचालयांची सोय नाही. अडचणी आहेत. पण त्याची आम्हाला पर्वा नाही. आम्ही आम्ही गृहिणी आहोत. जगाची आम्हाला फारशी जाण नाही. पण येथे आल्यावर आम्हाला समजले, हा लढा किती मोठा आहे. हा कीतीही दीर्घकाळ चालू देत आम्ही त्यासाठी तयार आहोत. निदर्शनाच्या ठिकाणी आम्हाला मिळणाऱ्या मदतीवरून संपूर्ण देश आमच्या पाठीशी असल्याची प्रचिती येत असल्याचे त्यांनी सांगितले. ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि कॅनडातील लोकही आमच्या पाठीशी असल्याचे आम्ही ऐकले आहे, असे त्या म्हणाल्या.
मदतीचा ओघ –
अनेक स्वयंसेवा संस्थांच्या सहाय्याने आणि देणगीदारांच्या मदतीने शेतकरी अजूनही ठाण मांडून आहेत. तेथे शिजवलेले अन्न, फळे, ड्राय फ्रुटस् अगदी चाटचाही पुरवठा सातत्याने होत आहे. चहा पकोडा, शीत पेये, खीर आणि अन्य मिष्टान्नेही आहेत. लॉन्ड्रीची सेवा आणि वैद्यकीय सुविधाही आहेत. नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. डेन्टल कॅम्प भरवले जात आहेत.
मोदी को मना के जायेंगे। अपने हक लेने आये है। पिछे नही हटेंगे। अगर जरूरत पडी तो यही मर जायेंगे।
दलजीत कौर
75 वर्षीय आंदोलक महिला