मुंबई – आपल्या नशीबामुळे देशात पेट्रोलचे भाव कमी झाले आहेत तर जनतेसाठी चांगलंच आहे, असं पंतप्रधान 2015 मध्ये जाहीर भाषणात सांगत होते. आता2021 मध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे, आता कुणाचं नशीब म्हणायचं पंतप्रधान महोदय? असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना भारतातच दर का वाढवले जात आहेत हे पंतप्रधान मोदींनी जनतेला सांगितले पाहिजे, अशी मागणी नवाब मलिक यांनी यापूर्वी केली होती. मात्र मोदींनी या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीच, उलट पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. पेट्रोलने शंभरी पार केली असताना नवाब मलिक यांनी मोदींना 2015 मधील त्यांच्या जाहीर वक्तव्याची आठवण करून दिली आहे.
आपल्या नशीबामुळे देशात पेट्रोलचे भाव कमी झाले आहेत तर जनतेसाठी चांगलंच आहे, असं मा. पंतप्रधान २०१५ मध्ये जाहीर भाषणात सांगत होते. आता २०२१ मध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे, आता कुणाचं नशीब म्हणायचं प्रधानमंत्री महोदय? – @nawabmalikncp@PMOIndia #PetrolDieselPriceHike pic.twitter.com/OSNtNae8Gg
— NCP (@NCPspeaks) May 27, 2021
पेट्रोलच्या वाढत्या दरांबाबत 2021 मध्ये मोदी काहीच बोलत नाहीत. त्यामुळे शेवटी काय ‘बदनसीब जनता’ असे उद्वेगपूर्ण ट्वीट करत आणि व्हिडीओ शेअर करत नवाब मलिक यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
मोदींच्या नशीबाने जर पेट्रोलचे दर कमी होतात, तर मग आता पेट्रोलने शंभरी कशी गाठली याचे उत्तर नशीबवान मोदींनी द्यावे, असे देखील नवाब मलिक यांनी म्हटले आहे.