मंगल कार्यासाठी लाखोंचा चुराडा : दागिन्यांसोबतच वाढलेय चारचाकी देण्याचे “फॅड’
शेरखान शेख
शिक्रापूर – वधू वराच्या लगीन घाईत सोन्याच्या वाढत्या बाजारभावाने वधू-वर पक्षाची धावपळ उडाली असून, बदलत्या काळानुसार लग्न थाटात करताना सर्वसामान्यांवर फार मोठा आर्थिक बोजा वाढला आहे. अनेकांनी आपली हौस मौज करण्यासाठी सोन्याच्या दागिन्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. यातच आपल्या लाडक्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून मोठमोठ्या वस्तूंसह चारचाकी देण्याचेही फॅड वाढले आहे.
ग्रामीण व शहरी भागात लग्नसराई सुरु असून लग्नकार्य मोठ्या थाटात करून द्यावे, असा आग्रह अनेक वर पक्षाकडून केला जातो. बदलत्या कार्यक्रम पद्धतीत हुंडा संस्कृती काहीशी बंद होत चालली असून, आता हुंडा नको; परंतु लग्न चांगले करुन द्या जमलं तर तुमच्या मुलीला दागिने करा म्हणत आजही अनेक विवाह ग्रामीण भागात साजरे होत आहेत. सर्वसामान्यांकडून आपल्या मुला मुलींचे लग्न चांगले व्हावे, यासाठी मोठा खर्च केला जातो. यात कपडे, संसारोपयोगी वस्तु, गाड्या, वाजंत्री, मांडव, कार्यालय व जेवण, लग्न पत्रिका यावर वधू पक्षाचा मोठा खर्च होत असतो. त्याच तुलनेत वरपक्ष देखील काही खर्च करतो.
गेल्या पाच दहा वर्षांत वाढत्या महागाईने लग्नकार्य करताना अनेक सर्व सामान्य कुटुंब कर्जबाजारी होतात. सोन्याचे भावही गगनाला भिडले आहेत. मागील पाच वर्षांच्या तुलनेत 22 ते 23 हजार रुपये एका तोळ्याचा बाजारभाव 35 ते 40 हजारांवर गेला आहे. हाच बाजारभाव नऊ ते दहा वर्षांपूर्वी 15 ते 16 हजार होता. तर 15 वर्षापूर्वी पाच ते सहा हजार रुपये एका तोळे सोने घेण्यासाठी लागत होते. त्यावेळी एक दोन ग्रॅमचे दागिने काहीसे मिळत नव्हते; परंतु बदलत्या बाजारपेठा व नवनवीन कमी किमतीच्या भरगच्च डिझाइन व आकाराने मोठे दिसणारे सोन्याची पॉलिश असलेले दागिने बाजार पेठेत मिळत आहेत.
सोन्याच्या वाढत्या बाजार भावाने सर्वसामान्य नागरिक या दागिन्यांकडे वळाले आहेत. एकीकडे लग्न समारंभामध्ये मोठमोठे सजावट व देखावे आणि सत्कार समारंभ यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असल्यामुळे आता लग्नाचा खर्च लाखोंची उड्डाणे गाठत असल्याचे दिसून येत आहे.
- ग्रामीण भागात एका लग्न समारंभाचा
कमी व जास्त चा खर्च - सन 2000 ते 2005 ……………………….एक लाख ते चार लाख
- सन 2005 ते 2010 ……………………..दोन लाख ते आठ लाख
- सन 2010 ते 2015 …………………पाच लाख ते पंचवीस लाख
- सन 2015 ते 2019 ………………….दहा लाख ते चाळीस लाख
वाढत्या महागाईत परंपरा जपण्यासाठी अनेक नागरिक हा खर्च आजही करत आहेत. - लग्नाचा कमीत कमी व जास्तीत जास्त खर्च
- कपडे – 50 हजार ते दहा लाख
- जेवण – 30 हजार ते पंधरा लाख
- वाजंत्री – वीस हजार ते तीन लाख
- कार्यालय – 40 हजार ते दहा लाख
- संसारोपयोगी वस्तू – दहा हजार ते आठ लाख
- सोने – चांदी दागिने – साठ हजार ते पंधरा लाख
- इतर खर्च – तीस हजार ते तीन लाख
घरासमोरील मांडव झाला सुना सुना –
घरासमोर मांडव टाकून होणारी लग्न आता पाहायला मिळत नाहीत. मंगल कार्यालयांकडे मोठा कल वाढलेला दिसून येतो. गेल्या काही वर्षांत शिरूर, आंबेगाव, खेड, हवेली यांसह जिल्ह्यात सर्वत्रच मोठ्या संख्येने मंगल कार्यालये उभी राहिली आहेत. प्रत्येक तालुक्यात साधारण 25 ते 30 मोठी मंगल कार्यालये असून अनेक मोठ्या गावांत किमान एक ते चार मंगल कार्यालय गेल्या पाच वर्षांत झाली आहेत.
लाखो रुपये खर्च करून अनेकांनी हे उभे केले असून सध्या त्यांना सोन्याचा भाव आला आहे. एका कार्यासाठी कमीत कमी तीस हजार ते जास्तीत जास्त तीन लाख रुपये भाडे या मंगल कार्यालयांना असून विविध आधुनिक सुविधा, डेकोरेशन, आकर्षक विद्युत रोषणाईने अनेक लग्न कार्य या भागात पार पडत आहे.
सामुदायिक विवाह सोहळे प्रेरणादायी
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी होणारे सामुदायिक विवाह सोहळे प्रेरणादायी आहेत. अनेकजण सध्या याकडे वळत असून त्यामुळे लग्नसमारंभात मोठ्या प्रमाणात होणारा खर्च वाचत असून सामुदायिक विवाह सोहळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे ठरत आहेत.