HSC Exam 2024 : राज्य शिक्षण मंडळातर्फे राज्यातील लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात होणार आहे. यंदा 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थी परीक्षा देणार आहे. विद्यार्थींना अर्धातास आधी परिक्षा केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात 271 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रश्नपत्रिकेचे लिफाफे ताब्यात घेतल्यापासून प्रश्नपत्रिका वितरित करेपर्यंतचे चित्रीकरण करण्यात येणार असून वाहतुकीवेळी जीपीएस प्रणालीचा वापर केला जाणार आहे. लिखाणासाठी वेळ कमी पडू नये यासाठी शेवटची 10 मिनिटे वाढवून दिली जाणार आहे.
कोणत्या शाखेचे किती विद्यार्थी परिक्षा देणार?
राज्यातील नऊ विभागीय मंडळांमध्ये इयत्ता बारावीसाठी एकूण तीन हजार 320 केंद्रांवर 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थी परीक्षा देणार असून परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. विज्ञान शाखा: 7, 60, 046, कला शाखा: 3,81, 982 वाणिज्य: 3, 29, 905, वोकेशनल: 37, 226, आय टी आय: 4750 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
परिक्षेदरम्यान काय उपाययोजना असणार ?
विद्यार्थ्यांचे परीक्षांबाबत दूरध्वनीद्वारे शंका समाधान व्हावे यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विभागीय मंडळ स्तरावर नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी सुविधा देण्यात येत आहेत. कमी गुण मिळालेल्या अथवा यशस्वी न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी जुलै महिन्यात पुरवणी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.