नवी दिल्ली – विराट कोहलीच्या अपयशाची चर्चा होत असली तरीही आकडेवारी पाहिली तर नियमित कर्णधार रोहित शर्माची कामगिरी गेल्या काही काळापासून अत्यंत सुमार झाल्याचे समोर येत आहे. मंगळवारी त्याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाबाद 76 धावांची खेळी केली असली तरीही यंदाच्या मोसमात त्याची कामगिरी सुमारच राहिली आहे.
कोहलीने इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत दोन सामन्यात 1 व 11 अशा एकूण 12 धावाच केल्या आहेत. मात्र, यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनची आकडेवारी लक्षात घेतली तर कोहली बरा असे म्हणायची वेळ आली आहे. रोहितने यंदाच्या मोसमात भारताकडून 16 डाव खेळले असून त्याच्या नावावर केवळ 426 धावा आहेत.
दुसरीकडे कोहलीने 17 डाव खेळताना 443 धावा केल्यात. रोहितने देखील कोहलीप्रमाणेच 2 अर्धशतके फटकावली आहेत. या वर्षी रोहितने टी-20 सामन्यांत एकूण 9 डाव, कसोटीत 3 तर एकदिवसीय सामन्यांत 4 डाव खेळले आहेत. कोहलीने एकदिवसीय सामन्यांत 6 तर कसोटीत 7 डावात फलंदाजी केली आहे. टी-20 मध्ये त्याने केवळ चार सामने खेळले आहेत.
यंदा येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. त्यामुळे या दोघांच्या कामगिरीबात चिंता निर्माण झाली आहे. आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात कोहली 3 वेळा शुन्यावर बाद झाला आहे. त्याने 16 सामन्यात 341 तर रोहितने 14 सामन्यात 268 धावा केल्या आहेत. यात रोहितचे एकच अर्धशतक आहे तर कोहलीची दोन अर्धशतके आहेत.