मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. त्यातून त्यांनी शिंदे गटाबरोबरच भाजपशी पॅच-अप करण्याचा पर्याय खुला ठेवल्याचे काही राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.
शिवसेनेतील बंडामुळे राज्यात सत्ताबदल झाला. त्या पक्षातील शिंदे गटाने भाजपशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केले. त्यामुळे बंडाला भाजपचीच फूस असल्याचा आरोप सातत्याने शिवसेनेकडून करण्यात आला. तसे असूनही ठाकरे यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या उमेदवार मुर्मू यांना पाठिंबा दिला.
त्यामुळे शिंदे गट आणि भाजपशी पुन्हा जुळवून घेण्यासाठी ठाकरे यांनी एकप्रकारे त्यांचे दरवाजे खुले ठेवले आहेत. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेचा ताबा स्वत:कडेच ठेवण्याचे मोठे आव्हानही ठाकरे यांच्या समोर उभे ठाकले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पॅच-अपच्या पर्यायाचा विचार होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या मित्रपक्षांमधील धुसफूस दडून राहिली नाही. त्या पार्श्वभूमीवर, प्रसंगी आघाडीतूनही शिवसेना बाहेर पडू शकते असे संकेतही ठाकरे यांनी दिल्याचे त्या विश्लेषकांना वाटते.