Manoj Jarange Patil – मुंबईत होणाऱ्या उपोषणाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व लाखो मराठा बांधव जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून (दि २०) रोजी आज मुंबईकडे निघणार आहेत. यापूर्वी आज मनोज जरंगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाटील यांनी सरकारवर पुन्हा एकदा जहरी टीका केली आहे.
मनोज जरंगे पाटील म्हणाले,’मराठा समाजाने सरकारला सात महिन्याच्या वेळ दिला मात्र सरकारने या कालावधीत आरक्षण दिले नाही. आता प्राण गेले तरीही आता मागे हटणार नाही. सरकारने काहीही उपाय केले नाही त्यामुळे आमच्याकडे मुंबईशिवाय पर्याय नाही. पुढील सात दिवसांमध्ये आम्ही मुंबईला पोहचणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली ते म्हणाले,’आरक्षणासाठी मराठा समाजाचे लोक अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहे. या दरम्यान शेकडो मराठे शहीद झाले आहेत. अनेक माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं आहे. अनेक घरांमधला कर्ता पुरुष गेला आहे. परंतु त्यानंतर सरकारने आरक्षण दिले नाही. आपली मुले मरत असताना सरकारला झोप कशी येते? सरकार इतके नालायक असू शकते का? सरकार निर्दयी आहे. निष्ठूर आहे. मराठा समाजाबद्दल हा सर्व विचार करताना मला रात्ररात्र झोप येत नाही. यामुळे आता आरपारची लढाई करण्याचा निर्णय मी घेतला आहे. असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.