जास्त काम आणि कमी दाम धोरण : प्रशासनाचे दुर्लक्ष
पुणे – देशात हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. यातही मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये अगदी टपरीवरील खाद्य पदार्थांपासून ते बड्या हॉटेलमधील खाद्यपदार्थांवर ताव मारण्यासाठी ग्राहकांच्या रांगा असतात.शहरातील बहुतांश हॉटेमध्ये दिवस-रात्र ग्राहकांचा राबता असतो. मात्र, त्या तुलनेत येथील कामगारांना अपुरे वेतन दिले जात असल्याचे समोर येत आहे. एकूणच या हॉटेलचालकांचे उत्पन्न मोठे असले, तरी या कामगारांची अवस्था मात्र दयनीय आहे. यावर दैनिक “प्रभात’ने टाकलेला प्रकाश.
बारा तासांची ड्युटी, सहा महिन्यांतून एकदाच सुट्टी
हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांची ड्युटी दहा ते बारा तासांची असते. यावेळी त्यांना कामातून उसंतही मिळत नाही. त्यांचे रात्रीचे जेवण अनेक वेळा बारानंतरच होते. ग्राहक गेल्यानंतर हॉटेलची साफसफाई पूर्ण झाल्यावर जेवण केले जाते. त्यांच्या जेवणासाठी कमी दर्जाचे धान्य दिले जाते. बहुतांश कामगार साप्ताहिक सुट्टीऐवजी सहा महिन्यांतून एकदा गावाला जाताना सुट्टी घेणे पसंत करतात. दक्षिणेकडून आलेल्या कामगारांना वर्षातून एकदाच गावी जाण्यासाठी सुट्टी दिली जाते.
आरोग्याच्या समस्या दुर्लक्षित
बार आणि रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अवस्था जरा जास्तच वाईट असते. त्यांना अंधूक अशा प्रकाशात सातत्याने दहा ते बारा तास काम करावे लागते. बारमध्ये कमी उजेड पडेल अशी दिव्यांची व्यवस्था केलेली असते. तसेच ग्राहकांना धुम्रपानाचीही सोय असल्याने सिगरेटच्या धुरात सातत्याने वावरावे लागते. अनेकांना हॉटेलमधीलच “ग्रेव्ही’त तयार केलेल्या भाज्या जेवताना खाव्या लागतात. नेहमी अशा प्रकारचे अन्न सेवन केल्याने त्यांना आरोग्याच्या समस्याही उद्भवत असतात.
समीर म्हणतो, “टेबल हाच बिछाना’
केरळमधून आलेल्या समीर (नाव बदलले आहे) वेटरने यासंदर्भात सांगितले की, “मी 20 वर्षांचा
असताना गावातील दुष्काळ आणि बेरोजगारीला कंटाळून काम शोधण्यासाठी पुणे शहरात आलो. येथे काम मिळाल्यावर आयुष्यात स्थिर होऊ, असे वाटत होते. येथे आल्यावर अगदी मिळेल ती कामे केली. यानंतर एका एजंटमार्फत बार आणि रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून कामाला लागलो. राहणे आणि खाण्याची सोय होत असल्याने हा पर्याय मी स्वीकारला. मात्र, येथे कामाचे तास खूप आहेत. शिवाय फक्त 8 हजार रुपये पगारात बारा-बारा तास काम करावे लागते. मी भाड्याने खोली घेऊन राहू शकत नाही, यामुळे दिवसभर ज्या टेबलवर सर्व्हिस देतो तोच टेबल रात्री माझा बिछाना असतो.
हॉटेल ग्राहकांना सेवा देण्यासाठी जे हात राबतात, त्यांना मात्र योग्य तो दाम दिला जात नाही. जास्त काम आणि कमी दाम असे धोरणच बहुतेक ठिकाणी ठरलेले असते. यातच साफसफाई आणी मोरी कामासाठी अल्पवयीन तसेच किशोरवयीन मुलांना तासन्तास राबवून घेतले जात असल्याचे चित्र आहे. हॉटेलध्ये राहणे आणि खाण्याची सोय होत असल्याने परिस्थितीने पिडलेले कित्येक किशोरवयीन मुले व तरुण हॉटेलमध्ये दिवसरात्र राबतात. हॉटेल व्यावसायिकांची संघटना असली, तरी हॉटेल कामगारांसाठी वेगळी अशी संघटना नाही. तसेच कामगार कायद्यानुसारही संबंधित कार्यालय त्यांची दखल घेताना दिसत नाही. हॉटेलमध्ये राबणारे बहुतेक हात हे दुष्काळग्रस्त भागातून आलेले आहेत. सात-आठ जणांच्या कुटूंबाला सांभाळण्यासाठी हवे ते काम करायची तयारी असणारी मुले शहरात येतात.
सुरूवातीला मिळेल ते काम करुन रेल्वे स्थानक, बस स्थानकात किंवा पदपथांवर रहातात. यानंतर हातगाडी, स्टॉल किंवा हॉटलामध्ये काम शोधले जाते. हॉटेल किंवा स्टॉलमध्ये काम शोधण्यामागे चहा, नाष्टा, जेवणाची सोय तसेच निवाऱ्याची सोय महत्त्वाची मानली जाते. हॉटेलमध्ये साफ सफाई, मोरीमध्ये भांडी घासणे तसेच टेबल साफ करण्याचे काम त्यांना मिळते. त्यांना साधारणत: 5 ते 7 हजार रुपये वेतन दिले जाते.