– अशोक सुतार
कथांचे अनेक प्रकार आहेत. लघुकथा, दीर्घकथा आणि त्यांच्याही अनेक उपप्रकार आहेत. कथा म्हटले की, ती थोडक्यात, आशयगर्भ हवी. ती विचार करण्यास प्रवृत्त करणारी किंवा संदेश देणारी हवी. यातला एक प्रकार “झेनकथा’ होय.कथेचे साधर्म्य कवितेशी जास्त आढळते. नेमक्या शब्दांत आशय, सूत्र आणि संहिता यांची प्रवाही मांडणी झाली पाहिजे.
सकाळची वेळ होती. मी आणि गुरुजी गच्चीवर उभे होतो. सकाळची हवा अल्हाददायक होती. गुरुजींनी जीवनावर बोलावे आणि मी लक्ष देऊन ऐकावे हा आमचा नित्यक्रम. गुरुजींनी विविध ग्रंथांचा अभ्यास केला होता. ते सत्तरीकडे झुकले तरी बुद्धीवर नियंत्रण होते. त्यांच्या शब्दांत कमालीचा धीरगंभीरपणा होता. गुरुजी तथागत गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचे अभ्यासक होते. बुद्धांचे अनेक विचार ते सांगत. त्यासोबत जातककथा, लोककथा सांगण्याचा त्यांचा छंद होता. एके दिवशी गुरुजींनी एक बोधकथा ऐकवली. ती एक झेनकथा होती. गुरुजींनी गोष्ट सांगण्यास सुरुवात केली.
पूर्वीच्या काळात एक विद्यार्थी गुरुकुलातून पूर्ण शिक्षण घेऊन बाहेर पडला. या विद्यार्थ्याचे नाव रोहित असे होते. रोहित हुशार होता; पण त्याला स्वतःबद्दल फाजिल विश्वास होता. मला जे काही येते ते माझ्या हुशारीमुळे असा विचार रोहित करत असे. रोहितला एका ज्येष्ठ व्यक्तीने सांगितले की, एका ठिकाणी एक गुरू आहेत, ते तुला अधिक चांगले ज्ञान देऊ शकतील. हे ऐकल्यावर रोहित त्या आचार्यांच्या आश्रमात गेला. सकाळची प्रसन्न वेळ होती.
आश्रमातील आचार्य शांत मुद्रेने ध्यानधारणा करीत बसले होते. ही त्यांच्या चिंतनाची वेळ होती. आचार्यांनी आसन सोडले व बाहेरील ओट्यावर आले. रोहितने आचार्यांना वंदन केले, पण तो जास्तीत जास्त स्वतःची माहिती सांगत होता. ही माहिती म्हणजे स्वअहंकार होता याची कल्पना रोहितला नव्हती. आचार्यांनी रोहितला पूर्णपणे बोलू दिले.
नंतर ते म्हणाले, मी आयुर्वेदिक चहा केला आहे, तू तो घेशील का? त्यावर रोहितने मान डोलवली व म्हणाला, पण आचार्यजी, मी जे काही शिकलो आहे ते सर्व तुम्हाला सांगितले. आता मला जे माहिती नाही, ते ज्ञान तुम्ही मला द्यावे. यावर आचार्यांनी स्मित केले. थोड्या वेळाने आचार्य चहा घेऊन आले. रोहितला चहा पिण्यासाठी कपबशी दिली. त्या बशीमध्ये आचार्य चहा ओतत होते, चहाने कप पूर्ण भरला; पण आचार्य चहा ओतत राहिले. आता त्या बशीतून चहा ओसंडून वाहत होता, जमिनीवर सांडत होता.
रोहितने आचार्यांना विचारले, आचार्यजी, हे काय करीत आहात? यावर आचार्य काहीच बोलले नाहीत. नंतर आश्रमातील सेवकाने जमिनीवर सांडलेला चहा पुसला, साफसफाई केली. रोहित दिवसभर आचार्यांसोबत राहिला. आता संध्याकाळ झाली, रोहितला घरी जायचे होते. मी निघू? असा रोहितने प्रश्न केला. त्यावर आचार्य म्हणाले, मी जे शिकवले ते लक्षात ठेव. रोहित आश्चर्यचकीत झाला, त्याने खूप विचार केला परंतु आचार्यांनी काहीच शिकवले नसल्याचे त्याला आठवत होते.
रोहित म्हणाला, आचार्यजी, आज तुम्ही काहीच शिकवले नाही. आचार्य म्हणाले, आठव. मी माझ्या शिष्यांना कृतीतून शिकवतो. आचार्य मंद स्मित करीत पुढे म्हणाले, तुला चहा दिला तो प्रसंग खूप महत्त्वाचा होता. कपबशी चहाने पूर्ण भरल्यानंतर ओसंडून वाहत होती. माणसाच्या मन व मेंदूत अनेक प्रकारचे दोष, अहंकार, गर्व यांचा कचरा भरलेला असतो. तो काढल्याशिवाय नवीन विचार आपण ग्रहण करू शकत नाही. तुझा ज्ञानाचा अहंकार, फाजिल आत्मविश्वास मन व मेंदूतून बाहेर फेकून दे, तरच तुझे कल्याण होईल.