नवी दिल्ली – सन 2020 हे साल घरांच्या विक्रीच्या बाबतीत दुर्देवी ठरले आहे. या वर्षात घरांच्या मागणीला फारसा उठाव मिळाला नाही. अनेक शहरांतील बांधलेली घरे विक्री अभावी पडून राहिल्याचे चित्र या वर्षात पहायला मिळाले. एका संस्थेच्या अहवालानुसार सन 2020 या वर्षात दिल्ली परिसरातील घरांची विक्री 50 टक्क्यांनी घटली असून देशातल्या आठ मोठ्या शहरातील घरांची विक्रीही 37 टक्क्यांनी घटली आहे.
सन 2020 या वर्षात दिल्ली परिसरात केवळ 21 हजार 234 घरांचीच विक्री होऊ शकली. तर देशातल्या आठ मोठ्या शहरांमध्ये एकूण 1 लाख 54 हजार 534 घरांची विक्री झाली आहे. या आठ शहरांमध्ये त्याच्या आधीच्या वर्षात म्हणजे सन 2019 सालात एकूण 2 लाख 45 हजार 861 घरे विकली गेली होती. ज्या आठ शहरांचा या ठिकाणी उल्लेख आला आहे त्यापैकी अहमदाबाद शहरातील डिमांड सर्वात मोठ्या प्रमाणात घटली असून सर्वात कमी डिमांड घटण्याचे प्रमाण पुण्यात नोंदवले गेले आहे.
पुण्यातील उपलब्ध आकडेवारीनुसार या शहरातील 26 हजार 919 घरे सन 2020 मध्ये विकली गेली आहेत. सन 2019 मध्ये पुण्यात 32 हजार 809 घरे विकली गेली होती. मुंबईतील विक्रीची घट ही 20 टक्के इतकी होती.
या शहरात यंदा 60 हजार 943 घरांच्या तुलनेत 48 हजार 688 घरांची विक्री झाली आहे. महाराष्ट्र सरकारने स्टॅम्प ड्युटीत चार टक्के इतकी घट काही महिन्यांसाठी घोषित केल्याने त्याचा घरांच्या विक्रीवर चांगला परिणाम दिसून आल्याचे निष्पन्न झाले आहे.
बंगलुरू मधील घरांच्या विक्रीतही 51 टक्के इतकी घट नोंदवली गेली आहे. या शहरात सन 2020 या वर्षात एकूण 23579 घरे विकली गेली आहेत. गेल्या वर्षी या शहरात 48076 घरे विकली गेली होती. चेन्नाईतील घटही 49 टक्के इतकी नोंदवली गेली आहे. हैदराबाद मध्ये 38 टक्के, कोलकाता शहरात 21 टक्के आणि अहमदाबाद मध्ये 61 टक्के इतकी घरांची विक्री घटली आहे.