पिरंगुट – उरवडे (ता. मुळशी) येथील आग लागलेल्या कंपनीला आज सकाळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट दिली. कंपनीला आग लागलेल्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच आगीत मृत पावलेल्या मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधला.
उरवडे (ता. मुळशी) येथील एसव्हीएस अॅक्वा टेक्नॉलॉजीस या कंपनीला सोमवारी (दि. ७) भीषण आग लागली. या आगीत आत काम करता असलेल्या १५ महिला आणि २ पुरुष अशा एकूण १७ जणांचा होरपळून मृत्यु झाला. या घटनेची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तात्काळ घेतली.
आज सकाळी दहा वाजता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कंपनीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी पाटील यांनी ज्याठिकाणी मृतदेह सापडले त्याठिकाणी पाहणी केली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील, प्रांत अधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार अभय चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, सभापती पांडुरंग ओझरकर, उपसभापती विजय केदारी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे, बाबा कंधारे आदी उपस्थित होते.
माध्यमांशी बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, कालची घटना अतिशय दुर्दैवी आहे. कारखान्यात असलेल्या ज्वलनशील पदार्थामुळे ही आग भडकली आहे. यामध्ये १७ कामगारांचा मृत्यु झाला आहे. आगीत सर्व मृतदेह जळुन खाक झाले असल्याने मृतदेहाची ओळख पटवणे अवघड आहे. डीएनए चाचणी करून मृतदेहाची ओळख पटवावी लागणार आहे. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जातील.
कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून प्राथमिक तपास सुरू आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर नेमके कारण सुस्पष्ट होईल. कंपनी मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास करून गुन्हा दाखल केला जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संगितले.