सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी 9.30 च्या सुमारास साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव मारुती स्विफ्ट कारने वळसे (ता. सातारा) गावच्या हद्दीत वळणावरील उड्डाणपुलावर पुढे निघालेल्या तीन मोटारसायकलींना पाठीमागून जोरदार धडक दिली होती. या अपघात प्रकरणी स्विफ्ट चालक अविनाश बाळकृष्ण पाटील (रा. कार्वे, ता.कराड) याच्यावर बोरगाव पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी पाटील हा त्याच्या मालकीची स्विफ्ट (क्र. एमएच-11-एडब्ल्यू-302) या कारने कराडवरून साताऱ्याच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी त्याच्या गाडीने महामर्गावर वळसे गावच्या हद्दीत तीन दुचाकींना धडक दिली होती.
या भीषण अपघातात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्य सहाय्यक राजेंद्र हणमंत घाडगे (वय 50, रा. समर्थनगर, ता. सातारा) यांचा दुर्दैवी अंत झाला होता. तर अन्य दोन मोटारसायकलींवरील अमर शिवाजी पानस्कर (वय 32, रा. मल्हारपेठ, ता. पाटण) व कुमार माणिक पोतदार (वय 36, रा. सासपडे, ता. सातारा) हे गंभीर जखमी झाले होते.
बोरगाव पोलिसांनी तासवडे टोलनाका येथील सीसीटिव्ही फुटेज पाहिल्यावर पाटील हा तासवडे टोलनाक्यावरून अवघ्या बारा मिनीनटांत वळशे येथे आल्याने त्याच्या कारचा वेग ताशी 120 च्या स्पीडने असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी पाटील याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.