नागपूर -करोनाच्या पहिल्या लाटेत भारतातील लघु उद्योगांनी काळजी घेऊन उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे आगामी काळात भारताचा विकास दर 10 टक्क्यांपेक्षा जास्त होईल असे अनेक विश्लेषकांना वाटते. करोनाच्या दुसऱ्या लाटेतही भारतीय लघुउद्योग उत्तम कामगिरी करतील आणि जागतिक पुरवठासाखळीमध्ये प्रवेश करतील असा दावा लघुउद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
गडकरी म्हणाले की, पहिल्या लाटेत लघुउद्योगांना केंद्र सरकारने भांडवली आणि इतर मदत केली आहे. याचा लघुउद्योगांनी योग्य फायदा घेतला आहे. चीनवर पूर्णपणे विसंबून चालणार नाही असे जगातील बऱ्याच देशातील मोठ्या उद्योगांना वाटते. त्यामुळे सुट्या भागासाठी चीन शिवाय इतर देशाकडे प्रयत्न चालू आहेत. याचा फायदा भारताने घेण्याची गरज आहे. तैवान, इंडोनेशिया, फिलिपाइन्स इत्यादी देश ही बाजारपेठ मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
भारतीय लघु उद्योगानी या पुरवठासाखळीचा भाग होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. यात भारतीय लघुउद्योग यशस्वी होतील. भारतीय लघु उद्योगाची उत्पादने जागतिक बाजारात पोहोचण्यासाठी ती दर्जेदार आणि कमी किमतीची असण्याचे गरज आहे.