हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – कळमनुरी तालुक्यातील सुकळी वीर येथील एका शेतकऱ्याने सव्वा एकरात लागवड केलेल्या टरबूज विक्रीतून ७० दिवसांत साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. यातून १ लाख १६ हजार ५०७ रुपये खर्च वजा करता शेतकऱ्याला २ लाख ४१ हजार २७४ रुपये निव्वळ नफा झाला. त्यांनी पहिल्यांदाच टरबुजाची लागवड केली होती. ( watermelon farming )
७० दिवसात साडेतीन लाख रुपयाचे उत्पादन –
सुकळी वीर येथील तरुण शेतकरी नकुल शेषराव वीर यांनी सव्वा एकर शेतातील टरबूजातून अवघ्या ७० दिवसात साडेतीन लाख रुपयाचे उत्पादन काढले आहे. सुकळी वीर गावातून इसापूर धरणाचा उजवा कालवा गेला असल्यामुळे येथे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. येथे बारमाही बागायती पिके घेतली जातात. त्यात केळी, ऊस, हळद या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या पिकांना फाटा देत येथील काही तरुण शेतकऱ्यांनी टरबूजाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे.
पारंपरिक पिकाला फाटा-
पारंपरिक पिकाला फाटा देत नकुल वीर यांनी आपल्या सव्वा एकर क्षेत्रावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने खोल नांगरटी व रोटरी करून घेतली. त्या सव्वा एकर क्षेत्रात टरबूज पिकांची लागवड करण्यासाठी सहा फुटावर बेड मारून घेतले. त्यानंतर रासायनिक खताचा डोज मिक्स करून टाकून घेतला. पिकाला पाणी देण्यासाठी ठिबकसिंचनचे नियोजन केले. व त्यावर मल्चीग टाकून झिगजेग पद्धतीने सव्वा फुटावर आठ हजार रोपांची लागवड डिसेंबर महीन्यात केली होती.
सूक्ष्म नियोजन –
पिकाला पाणी व खताचे सूक्ष्म नियोजन केले. पिकाच्या वाढीनुसार वेगवेगळी विद्राव्य खते ठिबकद्वारे पोटॅशियम शोनाइटसह दिली. विविध बुरशीनाशकांचा वापर केला. पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून आलटून पालटून वेगवेगळ्या रासायनिक औषधांचा फवारणी घेतल्या. रोपांची लागवड करताना रोपे हे नर्सरीतून आणल्यामुळे २१ दिवस वयाची होती. रोपांची शेतात लागवड केल्यानंतर ६५ ते ७० दिवसच देखरेख करावी लागली. टरबूज पिकाची काढणी केली असता सव्वा एकर क्षेत्रातून २९ टन १९५ किलो एकूण टरबूजचा माल निघाला.
प्रतिक्विंटल पाच किलो प्रमाणे त्याची कट्टी १४ क्विंटल ५९ किलो गेली असता, निव्वळ वजन २७ टन ७३५ किलो निघाला. टरबूजाला प्रति किलो १२ रुपये ९० पैसे प्रमाणे दर मिळाला विकलेल्या मालाची एकूण रक्कम ३ लाख ५७ हजार ७८१ रुपये मिळाली. व्यापाऱ्याने मालाची खरेदी शेतात येऊन केली.
शेतकऱ्याला अडीच लाखांचा निव्वळ नफा –
“गावातून इसापूर धरणाचा उजवा कालवा गेला असल्यामुळे येथे मुबलक पाणी ऊपलब्ध होते त्यामुळे मी माझ्या सव्वा एकर क्षेत्रात टरबूज पिकाच्या लागवडीकरिता पूर्व मशागत ८ हजार, मल्चिंग पेपर २० हजार १५०, रोप खरेदी १९ हजार २००, भेसळ डोज ८ हजार, मजुरी ५ हजार, विद्राव्य खते व फवारणी ४८ हजार ३०० व इतर खर्च मिळून एकूण खर्च १ लाख १६ हजार ५०७ रुपये आला. खर्च जाता, २ लाख ४१ हजार २७४ रुपये निव्वळ नफा झाला.” – नकुल वीर शेतकरी