हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – जिल्ह्यात जुन-जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सततच्या पावसाने नुकसान झाल्यानंतरही पीकविमा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने हिंगोली कृषी विभाग कार्यालयावर मोर्चा काढून कृषी विभागातील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देखिल चांगलेच धारेवर धरले होते. 15 मिनिटांत 13 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अन्यथा कृषी कार्यालय पेटून देऊ, अशा ईशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कृषी अधिक्षक यांना दिला. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका तुपकर यांनी घेतली होती.
अनेक शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम पिक विमा मिळाला आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते नामदेव पतंगे व गजानन कावरखे यांनी गेल्या आठ दिवसा पासून प्रत्येक गावात जाऊन हजारो शेतकऱ्यांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या. अखेर यात १५ दिवसांत संरक्षित रक्कम तसेच प्रलंबित १३.८९ कोटी देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलक मागे हटले.
सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे खरीप पिकाची प्रचंड नासाडी झाली, उत्पन्न घटले. मात्र विमा कंपनीकडून नुकसान भरपाई म्हणून मोजक्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा परताव्याची तुटपुंजी रक्कम जमा झाली. तर अनेकांना जुनाच विमा मिळाला नसताना नवीन विमा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात (दि. २३ डिसेंबर) रोजी हिंगोली जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष राजेश पाटील गोरेगावकर, माजी जि. प. महिला व बालकल्याण सभापती रूपाली पाटील गोरेगावकर, भास्कर पाटील, गजानन कावरखे, नामदेव पतंगे, परभणीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामराव अडकिने, मधुकर जामठीकर, कैलास वाबळे, भागवत मुटकुळे आदींसह सेनगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मुख्य मार्गाने हा मोर्चा निघाला. तेथून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर धडकला. तेथे शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला असता तुपकर, गोरेगावकर यांच्या शिष्टमंडळाशी जिल्हा कृषी अधिकारी व विमा कंपनी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.