हिंगोली – जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी अप्पर तालुका विक्रीला काढला आहे. खरीप हंगामात पिक हाती आले नाही, रब्बीमध्येही पिकांचे नु
कसान झाले, लागवडीचा खर्च निघाला नाही, त्यामुळे पिककर्ज भरण्याचा प्रश्न आहे. तालुक्यातील शेत जमीनी खरेदी कराव्या अन्यता इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.
या संदर्भात शेतकरी गजानन कावरखे, नामदेव पतंगे, दशरथ मुळे, संजय मुळे, गजानन जाधव, रामेश्वर कावरखे, रुस्तुम पवार, शंकर भाकरे, रायबा भाकरे, शंकर काळे, यांसह अनेक शेतकऱ्यांनी अप्पर तहसील कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे. मागील तीन वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. यावर्षी पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप हंगामाचे पिक हाती आले नाही. त्यातच अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर रब्बी हंगामात काही हाती लागेल या आशेवर शेतकऱ्यांनी हरभरा पेरणी केली. मात्र पावसामुळे हरभरा पिकही जळून गेले आहे.
दरम्यान, खरीप हंगामात लागवडीचा खर्च निघाला नाही तर रब्बीची ही परिस्थिती आहे. त्यामुळे उदरनिर्वाह कसा करावा ? तसेच बँकेचे कर्ज कसे फेडावे ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. पिककर्ज माफ करावे, पिकविमा द्यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अवयव विक्रीसाठी काढले होते. त्यानंतर त्यांना परत पाठविण्यात आले. त्यानंतर आज या शेतकऱ्यांनी अप्पर तहसील कार्यालयामार्फत शासनाकडे निवेदन सादर केले आहे. यामध्ये शासनाने अप्पर तहसील कार्यालयांतर्गत सर्व शेत जमीनी, जनावरे खरेदी करावेत व पिककर्ज भरून ध्यावेत किंवा इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. या मागणीमुळे प्रशासन अडचणीत सापडले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी चक्क अप्पर तालुका विक्रीचे बॅनर लावण्यात आले आहे.
बॅनरवर काय लिहिले आहे ?
1) शेतकऱ्यांना सरकट कर्जमाफी देण्यात यावी
2) पिक विमा देण्यात यावा
3) दुष्काळी अनुदान देण्यात यावे
4) तालुक्यातील खाजगी फायनान्स माफ करा
5) बोगस जैविक कीटकनाशकावर कार्यवाही करा
या वरील सर्व मागण्या मान्य करा अन्यथा आमच्या शेतकऱ्याला इच्छामरणाची परवानगी द्या, तीन वर्षापासून दुष्काळ, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, अप्पर तालुका गोरेगाव जिल्हा हिंगोली.