हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले म्हणजे औंढा नागनाथ, येथे आज शेवटच्या श्रावण सोमवारी भाविकांनी देशभरातून गर्दी केली आहे. नागनाथ प्रभूच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. हर हर महादेव, बम बम भोलेच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. बारीमध्ये दर्शनासाठी उभ्या असणाऱ्या भाविकांसाठी फराळ पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभू नागनाथच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत, अनेक भाविक भक्त पयदळ कावड यात्रा घेऊन औंढा नागनाथ येथे प्रभू नागनाथाच्या दर्शनासाठी येतात.
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग हे जग प्रसिद्ध आहे. येथील कला कौशल्य, प्राचीन असून पुरातत्त्व हेमाडपंथी मंदिर हे मराठवाड्यातील तीन ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून जगप्रसिद्ध आहे. मंदिरावर नक्षीदार कोरीव काम आणि छटा जगभरातील भाविकांना आकर्षित करतात. जगभरातुन महाशिवरात्री निमित्त भाविक लाखोच्या संख्येने श्री नागनाथ प्रभूच्या दर्शनासाठी येतात.
औंढा नागनाथ येथील जोतिर्लिंग शंकराचे येथील मंदिर हे पाच हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जातंय. संपूर्ण मंदिर एकाच पाषाणाच्या अखंड काळ्या दगडात कोरले असून यावर, हत्ती, घोडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे कोरीव काम केल्याच दिसून येते. मंदिरात प्रवेश करण्यासाठी, मुख्य तीन दरवाजे असून मंदिराचा मुख्य भाग भूगर्भात आहे. भूगर्भात प्रवेश केल्यानंतर आपल्याला महादेवाची पिंड दिसते. ही पिंड महादेव आणि श्री विष्णू देवाची असल्याचे मानल्या जाते. त्यामुळे नागनाथला हरिहर या नावानेही ओळखलं जाते. त्यामुळे येथे पिंडीला दुर्वा, बेल, फुले, नारळाची आरास वाहिली जाते. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात प्रभू शंकराचं दर्शन घेतल्याने भविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात अशी मान्यता आहे.
मंदिराची उंची 96 फूट एवढी उंची
प्राचीन काळात पाषाणात बांधलेल्या बारा ज्योतीलिंगामधील आठव्या स्थानावर औंढा नागनाथ (नागेश्वर )ज्योतीलिंग आहे या गावात एकेकाळी आमदरक सरोवर होते. हे मंदिर एका विस्तीर्ण 290 बाय 190 फूटाच्या आवरात आहे. त्या भोवती एक मोठा परकोट आहे. परकोटाला चार मुख्य प्रवेशद्वार आहेत. त्यातील उत्तरे कडील प्रवेशद्वारवर नगारखाना आहे. तेच मुख्य प्रवेशद्वार आहे. आवारातच एक पायविहीर आहे. तिचा नागतीर्थ असा उल्लेख केला आहे. सासू सुणेची बारव असेही तील मनतात. मुख्य मंदिराची लांबी 126फूट रुंदी 118 फूट आणि मंदिराची उंची 96फूट एवढी असून मंदिराला कुठलाही पाया नसून जमीनीच्या पृष्ठ भागावर या मंदिराची रचना केली आहे.
तर संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या काळात संत नामदेव महाराज कीर्तन करत असताना मंदिराने आपली जागा बदलली असल्याचा येथील भाविकांचा समज आहे. बाहेरुन मंदिराचे दोन भाग पाहायला मिळतात. पूर्वी मुघल साम्राज्यात येथील मंदिराचा काही भाग मुघलांनी पाडला असल्याचं सांगितलं जाते. यानंतरच्या काळात आहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करुन मंदिराच्या कळसाची स्थापना केली असल्याची इतिहासात नोंद आहे. म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरातून भाविक येथे येतात.