हिंगोली – जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात अजबच प्रकार समोरे आला आहे. एका शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या झेंडूच्या रोपांची चोरट्यांनी चोरी केली आहे. त्यामुळे परिसर खळबळ उडाली आहे. तुम्ही आतापर्यंत अनेक चोरीच्या घटना पाहिल्या आहेत मात्र लागवड केलेल्या रोपांची चोरीची ही पहिलीच घटना आहे.
ही घटना कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथील शिवारात घडली आहे. दरम्यान ५ हजार ५०० रोपांची चोरी झाल्याची माहिती सामोरे आली आहे. या वर्षी अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पेरल्या गेल्या नाहीत त्यामुळे आत्ता शेतकरी त्या जमिनीत झेंडू ची लागवड करणार आहेत. मात्र या वर्षी झेंडूच्या रोपांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यातच शेतकऱ्यांनी लागवड केलेले झेंडूच्या रोपांची चोरी झाली आहे.
याबाबत शेतकरी पंजाबराव निळकंठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी दि ०२ आॅगस्ट रोजी त्यांच्या शेतात ५ हजार झेंडूच्या रोपाची लागवड केली होती. याच कालावधीत त्यांचे भाऊ अनिल निळकंठे यांनी ३ हजार तर विजय निळकंठे यांनी २५०० हजार रोपांची लागवड केली होती. या रोपांसाठी त्यांनी ठींबकसिंचन पद्धतीने पाणी देण्याची व्यवस्था ही केली आहे.
दरम्यान, रविवारी (दि. 21) सायंकाळी साडेसहा वाजता सर्व जण घरी गेले होते. त्यानंतर आज ते शेतात आल्यानंतर झेडुंची रोपे चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने कळमनुरी पोलिसांना माहिती दिली. पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
दरम्यान, या घटनेमध्ये पंजाबराव यांच्या शेतातील २५००, अनिल यांच्या शेतातील १५०० तर विजय यांच्या शेतातील १५०० रोपे चोरीला गेली आहेत. यामध्ये अष्ठगंधा व टेनिस प्रजातींच्या झेंडूच्या रोपांचा समावेश होता. यामुळे या तिन्ही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी झेंडू लागवडीचा बरोबर अर्धाभागातीलच रोपेच चोरून नेली आहे. याप्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.