Himachal Political Crisis। राज्यसभेत क्रॉस वोटिंग झाल्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये नाट्यमय घडामोडी घडताना दिसून येतायत. काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा भाजपाच्या हर्ष महाजन यांनी पराभव केला. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा विजय स्पष्ट होता. परंतु, तरीही भाजपाच्या उमेदवाराल सर्वाधिक मते मिळाल्याने काँग्रेसचा पराभव झाला. परिणामी हिमाचल प्रदेशमध्ये क्रॉस वोटिंग झाल्याचे स्पष्ट झालं आहे.
क्रॉस वोटिंगनंतर हिमाचलचे मंत्री विक्रमादित्य सिंग यांनी काँग्रेसवर आरोप करत मंत्रीपदाचा राजीनामा दिला.तर, दुसरीकडे भाजपाने राज्यपालांची भेट घेऊन बहुमत चाचणीची मागणी केली आहे. तसंच, भाजपा आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातल्याने १५ भाजपा
आमदारांना निलंबित करण्यात आलंय. गेल्या २४ तासांत या तीन घडामोडी घडल्या आहेत.
विक्रमादित्य सिंग यांचा राजीनामा Himachal Political Crisis।
काँग्रेस आमदार विक्रमादित्य सिंग यांनी बुधवारी सकाळी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांनी आरोप केला की, सुखविंदर सिंग सुखू-सरकारने आपल्याच आमदारांचा अनेक वेळा अपमान केला. “अपमान सहन केला जाणार नाही” असे सांगून विक्रमादित्य पुढे म्हणाले, “आता हिमाचलमध्ये काँग्रेस कोठे आहे हे पक्षाच्या हायकमांडला ठरवायचे आहे.” ते म्हणाले, “लोकांनी मतदान केले म्हणून ते सरकार वाचले पाहिजे अशी आमची इच्छा आहे.”
राज्यसभेत क्रॉस वोटिंग Himachal Political Crisis।
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्याचा दावा केला जातोय. काँग्रेसला स्पष्ट बहुमत असतानाही भाजपाचा उमेदवार जिंकून आला. या निकालानंतर भाजपाने काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसने आता बहुमत गमावले असून त्यांनी सत्तेतून पायउतार व्हावे, अशी मागणी करण्यात आली. तसंच, राज्यपालांची भेट घेऊन काँग्रेस सरकारची बहुमत चाचणी घेण्याची विनंती करण्यात आली.
माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासह 14 भाजप आमदारांना निलंबित
हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेचे अधिवेशन सुरू होताच सभापतींनी भाजपच्या 15 विरोधी आमदारांना निलंबित केले आहे. या आमदारांमध्ये जयराम ठाकूर, विपिन सिंह परमार, रणधीर शर्मा, लोकेंद्र कुमार, विनोद कुमार, हंस राज, जनक राज, बलबीर वर्मा, त्रिलोक जामवाल, सुरेंद्र शोरी, दीप राज, पूरण ठाकूर, इंदर सिंग गांधी, दिलीप ठाकूर आणि इंदर यांचा समावेश आहे.