वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे गेल्या काही वर्षांपासून मोसमी पाऊस लहरी होत चालला आहे. पावसाच्या लहरीनुसार आपल्याकडील शेतीतंत्रात मोठे फेरबदल करावे लागतील, असे तज्ज्ञांकडून ऐकायला मिळते.
देशाचा अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्यांबरोबरच सर्वसामान्यांसाठी जून महिना हा अत्यंत महत्त्वाचा असतो. मृग नक्षत्रावर मान्सूनचे आगमन झाले आणि त्याची संततधार बरसात सुरू झाली तर बळीराजा सुखावतो. अलीकडील वर्षांत साधारणतः 15 ते 20 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होऊन त्याने देश व्यापलेला असतो. काही वेळा तर सुरुवातीच्या दिवसांमध्ये जून महिन्यातील सरासरीइतका पाऊस पडल्याच्याही नोंदी आहेत. पण यंदा 15 जून उलटून गेल्यानंतरही मान्सूनचा वर्षाव राज्यात झालेला नाहीये.
अनेक हवामानतज्ज्ञांच्या मते, यंदा अल निनोसह अन्य काही कारणांमुळे मान्सूनचा पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. पूर्वमोसमी पावसापाठोपाठ आपल्याकडे सलग चार महिन्यांचा पावसाळा सुरू होणे सामान्यतः अपेक्षित असते. परंतु यावर्षी मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासच उशीर झाला. बिपरजॉय चक्रीवादळ आणि अल निनोच्या परिणामांचा मान्सूनच्या आगमनाला फटका बसला. परिणामी, खरीप पिकांच्या पेरणीची तयारी सुरू करणारे शेतकरी चिंतेत आहेत. राज्यात 9 जूनपर्यंत सरासरीच्या केवळ 8.8 टक्के पाऊस पडला आहे. राज्यातील खरीप पिकांच्या एकूण पेरणी क्षेत्रापैकी 0.77 हेक्टर म्हणजेच केवळ एक टक्का क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. राज्यात खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र 142.02 लाख हेक्टर असून ऊस पिकासह हे सरासरी क्षेत्र 152.97 लाख हेक्टर आहे.
शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्यामुळे मान्सूनमधील बदलांचा जितका शेतीवर परिणाम होतो तितकाच अर्थव्यवस्थेवरही होतो. भारतीय अर्थव्यवस्थाच मान्सूनवर पूर्णपणे अवलंबून आहे. मान्सून कमी झाल्यास देशाच्या विकासावर आणि अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होण्याची भीती असते. मान्सून कमकुवत राहिल्यास एकीकडे उपभोग्य वस्तूंची मागणी कमी होऊन अर्थव्यवस्थेची गती मंदावते तर दुसरीकडे अन्नधान्याची आयात करावी लागते. याव्यतिरिक्त पीककर्ज माफ करण्यासारखे उपाय सरकारला वारंवार योजावे लागतात आणि सरकारी तिजोरीवरील बोजा वाढतो. एकंदरीत, मान्सून कमकुवत राहिल्यास अर्थव्यवस्थेवर चहूबाजूंनी परिणाम होतो.
मान्सून मनासारखा न झाल्यास राष्ट्रीय उत्पन्न कमी होण्याबरोबरच सरकारचा महसूलही मोठ्या प्रमाणात कमी होतो. म्हणजेच, सरकारचा महसूल आणि उत्पन्न दरवर्षी मान्सूनवरच बहुतांश अवलंबून असते, असे म्हणता येईल. म्हणूनच मान्सूनचे आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे जवळचे नाते आहे, असे म्हटले जाते. मान्सून कमकुवत राहिल्यास देशासमोर मोठी संकटे उभी राहतात. शेती उत्पादनावर परिणाम होतो. पिके हातची गेल्यास महागाई होणे अटळ असते. एवढेच नव्हे तर अर्थव्यवस्था गतिमान करण्याच्या सर्व प्रयत्नांनाच सुरुंग लागतो. ग्रामीण कुटुंबांची उपजीविका आणि एकंदर ग्रामीण अर्थव्यवस्थाच पावसाच्या प्रमाणावर अवलंबून असते. पाऊस चांगला झाल्यास पिके चांगली येऊन लोक बाजारपेठेतील खरेदी वाढवितात आणि ग्रामीण अर्थव्यवस्था गतिमान होते. देशाचा दोनतृतीयांश भाग ग्रामीण असून, शेती हाच तेथील लोकांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मान्सून लांबण्याविषयी ज्या बातम्या सध्या येत आहेत, त्यामुळे चिंता वाढत चालली आहे, त्याची हीच कारणे आहेत.
देशातील केवळ 40 टक्के शेतीक्षेत्र असे आहे, जेथे सिंचनाच्या सुविधा आहेत. मान्सूनमध्ये झालेल्या बदलांचा मुकाबला करण्याची ताकद केवळ या 40 टक्के क्षेत्रातील शेतकऱ्यांकडेच कशीबशी आहे. परंतु उर्वरित कृषिक्षेत्र मान्सूनवरच पूर्णांशाने अवलंबून आहे. अशा स्थितीत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्यामुळे अनंत अडचणी उभ्या राहतात. मान्सूनचे प्रमाण आणि अन्नधान्याचे उत्पादन यात जवळचा संबंध आहे. कमी पाऊस आणि वाढती महागाई असेच समीकरण पाहायला मिळते. त्यामुळेच यंदा मान्सूनबाबत अनिश्चितता असल्यानेच आरबीआयने पतधोरण जाहीर करताना महागाईबाबत सावध पवित्रा घेतलेला दिसला. मान्सूनचा पाऊस कमी झाल्यास पावसावर शेती अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांवर त्याचा थेट आणि सर्वाधिक परिणाम होतो. या सर्व चर्चेवरून भारतातील शेती आजही पावसावर बव्हंशी अवलंबून आहे, असेच म्हणावे लागेल.
भारताला आवश्यक असणाऱ्या अन्नधान्याची शंभर टक्के पूर्तता स्थानिक शेतीद्वारे होते. शेतीचा हंगाम यशस्वी होण्यावरच पुढील गोष्टी अवलंबून असतात. याखेरीज देशातील 22 कोटी जनावरांना चाराही शेतीपासूनच प्राप्त होतो. शेती अडचणीत आल्यामुळे किंवा पीकपाणी कमी आल्यामुळे जनावरांपासून शेतकऱ्यांना मिळणारे लाभही कमी होतात. त्याचप्रमाणे, मान्सून कमकुवत झाल्यास किंवा प्रतिकूल झाल्यास शेतीशी निगडित अनेक उद्योगांना कच्चा मालही परदेशांतून मागवावा लागतो. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर परदेशी चलन खर्ची पडते. याउलट, मान्सून अनुकूल राहिल्यास शेती उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर निर्यात करून परदेशी चलन कमावता येते.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मान्सूनच्या बदलत्या आलेखानुसार, जर भारतीय शेतीचे अनुकूलन केले नाही, तर आपल्या देशात अन्नधान्याचे मोठे संकट निर्माण होऊ शकते. अन्नधान्याची कमतरता जाणवल्यास संपूर्ण अर्थव्यवस्थाच अडचणीत येऊ शकते. भारतातील शेती सिंचनासाठी मान्सूनच्या कृपेवरच अवलंबून असल्यामुळे तसेच जागतिक तापमानवाढीने संपूर्ण निसर्गचक्रच बदलले असल्यामुळे त्याचा थेट प्रभाव शेतीवर पडत आहे. दिवसेंदिवस आपल्या गरजा मात्र वाढत आहेत. सरकारकडून घाईघाईने पेरण्या न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतीचे नियोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा दुबार पेरणीच्या दुष्टचक्रात अडकण्याची वेळ येईल.
विलास कदम