मुंबई – मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी चिपळूणमधील बहादूर शेख नाक्यावर (Chipalun Bridge) कोकणातील सर्वात मोठा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या उड्डाणपुलाच्या कामाला गेल्या काही दिवसांपासून वेग आला होता. मात्र सोमवारी सकाळी 8.30 च्या सुमारास पुलाच्या मध्यवर्ती भागातील दोन गर्डर कोसळून मोठा अपघात झाला. याचपार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी चिपळूण पूल दुर्घटनेची उच्च स्तरीय चौकशी करण्याचे तसेच कंत्राटदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.
अंबादास दानवे यांनी चिपळूण पूल दुर्घटनेवर (bridge accident) बोलताना प्रश्न उपस्थित केला की, या प्रकारच्या दुर्घटना दुसऱ्या कोणत्या सरकारच्या कालावधीत घडल्यास भाजपाचे नेते थयथयाट करतात, मग आता मूग गिळून गप्प का बसले? बंगालमध्ये पूल पडल्यावर भाजपा नेत्यांनी संपूर्ण देश डोक्यावर घेतला होता. महाराष्ट्रात पूल कोसळण्याची घटना ही सरकारसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. एजन्सीला काम दिल्यावर संबंधित अभियंता ढुंकूनही बघत नाही.
या सर्व कामात फक्त नफेखोरी केली जाते, असा आरोप करत दानवे यांनी या दुर्घटनेची उच्च स्तरिय चौकशी व्हावी, अशी मागणी लावून धरली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून कोकणात सर्वात मोठ्या पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या गर्डरमुळे आधीच या मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण झाला होता. याशिवाय पुलाचे काम सुरू असतानाच पुलाच्या काही भागाला तडे गेल्याचे समोर आले असतानाच काही वेळातच या पुलाचा मोठा भाग कोसळल्याने मोठी खळबळ उडाली. या पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना या परिसरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.