संगमनेर – महाराष्ट्रात गेली 70 ते 75 वर्षे मराठ्यांच्या जीवावर राज्यातील पक्ष मोठे झाले. त्यांना आपण मोठे केले परंतु आज मराठा समाजाला त्यांची गरज भासू लागली. अनेक ओबीसी नेत्यांनी 30 ते 35 वर्षे सत्ता भोगली आणि तेच आता जातीजातीत मतभेद निर्माण करून त्यांच्यात भांडणे लावण्याचे काम करत आहे. त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी मराठ्यांनी एकजूट करायला हवी आहे. मराठा आरक्षणाच्या वाट्याला जर कोणी केले तर त्याचा मी नक्कीच करेक्ट कार्यक्रम करेल, असा इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता दिला.
संगमनेर शहरातील जाणता राजा मैदानावर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विराट सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जरांगे बोलत होते. जरांगे म्हणाले, गेली 70 वर्षांत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणाऱ्या नेत्यांची नावे जाहीर करणार, असे सांगितल्यानंतर खऱ्या अर्थाने सरकारला जाग आली आणि सरकारने कुणबी नोंदी शोधण्याचे काम शिंदे समितीला दिले.
शिंदे समितीने हे काम जलद गतीने केले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील जवळजवळ 32 लाख कुणबी नोंदी शोधल्या गेल्या आहेत. सरासरी दोन कोटी मराठा समाजाच्या मुलांना प्रमाणपत्र मिळणार आहे.मी मरेपर्यंत माझ्या मराठा समाजाशी गद्दारी करू शकत नाही. आतापर्यंत मराठ्यांचा विश्वासघात झाला असून त्यामुळे मराठ्यांना आरक्षण दिले नाही. ज्यांनी मराठ्यांना आरक्षण दिले नाही त्यांचे नाव आम्हाला कळू द्या. आता सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे. या राज्यात 32 लाख मराठा नोंदी आरक्षणात असलेल्या सापडल्या असून कुणबी प्रमाणपत्रही देण्याचे काम सुरू झाले. आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठा समाज मोठ्या ताकदीने एकवटला आहे.त्यामुळे सरकारला दखल घ्यावी लागली आहे.