डॉ. विशाल खळदकर
कॅन्सर तज्ज्ञ : एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली
गेल्या 30 वर्षांत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. शहरापुरती मर्यादित असलेली हॉस्पिटल्स आणि मल्टी आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स तालुक्यात तसेच मोठ्या लोकसंख्येच्या गावांत सेवा देत आहेत. वर्ष 1990 पूर्वी मेट्रो सिटीत हॉस्पिटल्स होती. त्यानंतर जागतिक उदारीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर शहरात आरोग्याच्या सुविधा निर्माण झाल्या आणि विविध किचकट व्याधींवर उपचार होऊ लागले.
वर्ष 1992 नंतर खऱ्या अर्थाने या क्षेत्राला गती मिळाली. मोठ्या शहरापुरती मर्यादित सुविधांवर जिल्हा आणि राज्याच्या डोलारा होता. विविध आजारांवरील उपचारासाठी पुणे, मुंबई शहराकडे धाव घ्यावी लागत होती. मात्र, गेल्या दोन दशकांपासून पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, हवेली, दौंड, जुन्नर, आंबेगाव, खेड आदी तालुक्यांत वैद्यकीय सेवेने ग्रामीण जनतेची अचूक नाडीनिदान केले आहे.
आज संपूर्ण विश्व करोनासारख्या महामारीच्या संकटातून जात आहे. शहरी आणि ग्रामीण भागांतील सेवेचा परामर्श घेताना पुणे जिल्ह्यातील आरोग्य सुविधा आणि आधुनिक बदल हे सुखावणारे ठरले आहेत. दुसऱ्या लाटेत देश हतबल झाला असताना आरोग्य यंत्रणा जीव तोडून कामाला लागली. ऑक्सिजन बेड, रेमडेसिविर, औषधांची कमतरता भासल्याने लाखो लोकांचा मृत्यू झाला.
पुणे, मुंबई आदी शहरांतील मोठ्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळाले नाहीत. यासमयी ग्रामीण डॉक्टर्सने आणि हॉस्पिटल्सने मोलाची कामगिरी बजावली. ग्रामीण भागातील रुग्ण आणि डॉक्टर्सची कायमची नाळ जोडलेली असते. कितीही गंभीर आजार असो त्याची पहिली लक्षणे आणि निदान करणारा हा फॅमिली डॉक्टरच असतो. त्यांच्या सल्ल्यानेच पुढील उपचारासाठी शहरात जातात. कारण, लोकांचा विश्वास डॉक्टरवर असतो.
ग्रामीण डॉक्टर हे त्याचे वैयक्तिक आणि वर्षानुवर्षे असलेले संबंध जोपासतात. ग्रामीण डॉक्टर्सने कोविड काळात जोखमीचे काम हाती घेऊन चांगली कामगिरी केली आहे. रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले. यात राजकीय आणि सामाजिक लोकांनी एकत्रित येऊन नवीन कोविड सेंटर सुरू केली. त्यामुळे 30 वर्षांत आरोग्य क्षेत्रात दर्जेदार सुधारणा झाल्यामुळे हे शक्य झाले आहे.
वर्ष 2007 पूर्वी ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची वानवा होती. मात्र, नंतर खऱ्या अर्थाने आमूलाग्र बदल होत गेला. विशेषत: हॉस्पिटलचे नूतनीकरण आणि नवीन तंत्रज्ञान दाखल झाले. याची पहिली प्रचिती करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत प्रत्ययास आली. ग्रामीण भागात आता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुविधा, तंत्रज्ञान माफक दरात उपलब्ध करून दिले आहेत.
वर्ष 2007 पूर्वी छोट्या उपचारासाठी पुणे, मुंबईसारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये किंवा शासकीय हॉस्पिटलमध्ये लोकांना जावे लागत होते. हृदयाच्या आजारावरील उपचारासाठी 2 डी ईको, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीसाठीही पुण्यात जावे लागत होते. न्यूमोनियावर उपचार आणि निदानासाठी सीटी स्कॅन, किडनीसाठी डायलिसिस शहरात होते. एखाद्या रुग्णाला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर सुविधेसाठी पुण्यात होते.
हाडाचे आजार, सांधे प्रत्यारोपणासाठी पुणे येथे जावे लागत होते. कॅन्सरसारख्या आजारावर निदान, उपचार हे 40 वर्षांपूर्वी मुंबईत होत होते. लहान मुलांचे आजार, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करावी लागत होती. पारंपरिक उपचाराला छेद देत अलीकडील नवीन उपचार पद्धती, तंत्रज्ञान पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात उपलब्ध झाले आहेत. निदान, उपचार होत आहेत. याचा फायदा कोविडच्या संकटात लोकांना झाला आहे.
सर्व हॉस्पिटल्स आणि डॉक्टरांच्या टीमने झोकून देऊन काम केले. हे संकट काही काळापुरते शमविण्यात खासगी हॉस्पिटलसचे यश आहे. दिल्ली, मुंबई, पुण्यात करोनावरील उपचार हे वर्षभरापासून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही झाले आहेत. नवीन उपचार पद्धतीमध्ये बारामती, दौंड, शिरूर, सासवड, खेड, राजगुरूनगर, मंचर, इंदापूर, उरूळी कांचन, लोणी काळभोर, केडगाव, भिगवण, जेजुरी, जुन्नर आदी शहर आणि निमशहरात हॉस्पिटल्सची संख्या लक्षणीय आहे.
गरजू, सर्व घटकांमधील लोकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली आहेत. ग्रामीण डॉक्टर्सची क्षमता नक्कीच चांगली आहे. त्यांनी अत्याधुनिक बदल आणि क्लिनिकल अनुभवावर उपचार केले आहेत. यात हे यश दिलासा देणारे आहे.
शासनाच्या आरोग्य योजना पोहोचल्या गावात
बदलत्या काळानुरूप नवीन उपचार पद्धतीचे अनुकरण करणे ही काळाची गरज आहे. हे ओळखून सर्व डॉक्टर्सनी उपचार पद्धत आणि हॉस्पिटलमधील सुविधांमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. या बदलाला ग्रामीण जनतेने लोकमान्यता दिली. ही आरोग्य क्षेत्रातील जमेची बाजू राहिली आहे.
केडगाव, बारामती, दौंड, सासवडसारख्या ग्रामीण ठिकाणीवरील हॉस्पिटल्सने हृदयरोगवरील सर्व उपकरण विकसित करून आणि डॉक्टर्सच्या टीमने अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीसारखी सुविधा दिली आहे. किडनीच्या रुग्णासाठी डायलासिसची सेवा महात्मा जोतिबा फुले योजनेअंतर्गत उपलब्ध केली आहे. शासनाच्या आरोग्य योजना आता गावागावांपर्यंत पोहोचल्या आहेत.
हे बदल अलीकडील प्रकर्षाने जाणवत आहेत. ग्रामीण भागात कर्करोगावर उपचार सुरू केले आहेत. आरोग्य क्षेत्रातील झालेले बदल ग्रामीण भागात पोहोचविण्यात डॉक्टर्स आणि त्यांच्या टीमचे योगदान आहे. त्यामुळे जनतेला सुविधा आणि उपचार मिळत आहेत.
आरोग्य क्षेत्रातील हे देवदूत झोकून देऊन काम करीत आहेत. हे गावगाड्यातील लोकांसाठी अभिमानास्पद आहे. त्यामुळे महामारीच्या काळात झोकून देऊन काम करणाऱ्या देवदूत अर्थात डॉक्टर्सना “डॉक्टर्स डे’निमित्त सर्वांना शुभेच्छा.
शब्दांकन : विनोद गायकवाड, कुरकुंभ.
त्रिभुज शेळके, पारगाव