मंचर,(प्रतिनिधी) – गावच्या हद्दीत असलेल्या एस कॉर्नर येथील शेतकरी रामदास बबन बढे यांच्या शेतातील कांदा पिकावर अज्ञात व्यक्तीने तणनाशक मारून पिकाचे नुकसान केले आहे. यात त्यांचे अंदाजे 50 गोणी कांद्याचे नुकसान झाले आहे.
मंचर येथील एस कॉर्नर येथे रामदास बढे यांची शेती असून दोन एकर क्षेत्रात कांदा पीक घेतले आहे. त्यातील अर्धा एकरच्या प्लॉटमध्ये असलेल्या काद्यांचे दोन वाफ्यांना अज्ञात व्यक्तीने तणनाशक मारले आहे. हे कांदा पीक अडीच महिन्याचे झाले असून पुढील एक महिन्यात कांदा काढणीला येणार होता; मात्र अज्ञात व्यक्तीने आठ ते दहा दिवसांपूर्वी हे तणनाशक मारले असावे व त्याचा परिणाम आता दिसू लागला असल्याचे शेतकरी बढे यांनी सांगितले.
हे दोन वाफे मोठ्या लांबीचे असल्याने या यामध्ये अंदाजे 50 गोणी कांद्याचे नुकसान झाले आहे. दोन वर्षांपूर्वीही या शेतीमध्ये टोमॅटो पिकावरही अशाच प्रकारे तणनाशक मारून टोमॅटो पिकाचे नुकसान करण्यात आले होते.
अगोदरच उन्हाळ्यात शेती पिकांना पाण्याची कमतरता, रात्रीच्या वेळी बिबट्याची भीती व त्यात असे प्रकार घडू लागल्याने चिंता वाढली आहे. कुणीतरी अज्ञात व्यक्ती मनात संकुचित वृत्ती ठेवून असे प्रकार करत आहे. -रामदास बढे, शेतकरी मंचर